सोलापूर – शासनाकडून ज्या शेतकऱ्यांना कांदा अनुदान अद्याप मिळाले नाही, अशा शेतकऱ्यांना लवकरच प्रति क्विंटल दोनशे रुपये प्रमाणे अनुदान जमा करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे येथे भारत जाधव यांच्यातर्फे सहकार मंत्री देशमुख यांच्या हस्ते पशुपालकांना चाऱ्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
सहकारमंत्री देशमुख म्हणाले, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुक्या जनावरांसाठी वाटप करण्यात आलेल्या चाऱ्यामुळे पशुपालकांना दिलासा मिळणार आहे. शासनाच्या वतीने दुष्काळी उपाययोजना करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करण्यासंदर्भात निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. शासनाच्या वतीने दुष्काळी उपाययोजनासाठी ठोस पावले उचलण्यात येतील. तसेच सीना नदीमध्ये कायमस्वरूपी पाणी सोडण्याकरिता आपण प्रयत्नशील असल्याचेही देशमुख यांनी यावेळी सांगितले. यावेळी शेतकऱ्यांनी सहकार मंत्री देशमुख यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.