विकास कामे थंडावली
समिती सदस्यांनी दिलेले राजीनामे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी निवड प्रक्रियेवर घेतलेला आक्षेप यामुळे समित्यांचे चालणारे कामकाज पूर्णपणे थंडावले आहे. तरीही महिला कल्याण बाल समितीच्या झालेल्या बैठका आणि त्यात झालेले ठराव बेकायदेशीर असल्याची तक्रारसुद्धा झाली आहे. समित्यांचे कामकाज थंडावल्याने विकास कामांना खीळ बसली आहे. उदयनराजे भोसले यांनीसुद्धा या प्रक्रियेत हस्तक्षेप करत थेट जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा केली. मात्र, तांत्रिकतेचा घोळ न सुटल्याने विकास कामांची फक्त चर्चाच होत आहे.
सातारा – सातारा पालिकेतील विषय समिती सदस्यांची निवड प्रक्रिया चुकल्याचा अहवाल प्रांत कार्यालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या तातडीच्या प्रक्रियेत जिल्हा प्रशासन गुंतल्याने या निवडी सध्या तरी लांबणीवर पडल्या आहेत. दस्तुरखुद्द खासदार उदयनराजे भोसले यांच्या विचारणेनंतरही प्रशासनाला पुरेसा वेळ न मिळाल्याने समिती सदस्य निवडींचा शुक्रवारचा (दि. 9) चा मुहुर्त हुकला. या कायदेशीर पेचावर काय मार्ग काढता येईल यावर जिल्हा प्रशासनाकडून जुळवाजुळव सुरु आहे.
सातारा पालिकेतील विषय समित्यांच्या निवडी कायदेशीर पेचातून जात आहेत. पालिकेच्या 22 जुलै रोजी झालेल्या विशेष सभेत पाणीपुरवठा सभापती वगळता चार सभापती व समिती सदस्यांची निवड करण्यात आली होती. मात्र, यामध्ये सभापती दोनपेक्षा अधिक समितीचे सदस्य व एकमेकांना सूचक अनुमोदक असल्याची गंभीर तांत्रिक चूक दक्ष सामाजिक कार्यकर्ते ओंकार तपासे यांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना निदर्शनास आणून दिली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांतांना चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देऊन पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. सातारा जिल्ह्यात कराड व पाटण तालुक्यात अतिवृष्टी व भूस्खलनाच्या घटना घडल्याने जिल्हा प्रशासनासह संपूर्ण महसूल यंत्रणा पुनर्वसनाच्या प्रक्रियेत गुंतली आहे.
अशाही कार्यव्यस्ततेत प्रांत स्वाती देशमुख यांनी कलम 64 (2) चा निवड प्रक्रियेत भंग झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी दि. 9 रोजी समिती सदस्यांच्या निवडी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, तांत्रिक पेच कसा सोडवायचा हे आव्हान जिल्हा प्रशासनापुढे आहे. समित्या बरखास्त करून त्यांची फेरनिवड घेणे व समिती सदस्यांमधूनच सभापती निवडले जातात. मात्र, सदस्य निवडीच चुकल्याने सभापती निवडी तरी कशा वैध धरायच्या, असा आक्षेप तक्रार कर्त्यांनी घेतला आहे. त्यामुळे या पेचावर कसा मार्ग काढायचा यावर नगर परिषद संकलन विभागाला काथ्याकुट करावा लागत आहे. सभापतीनी समिती सदस्यांचे राजीनामे सादर केले मात्र सभापतीचे राजीनामे मात्र अद्याप सादर झालेले नाही.