अन्नधान्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर
वाई – बावधन परिसरातील सोनजाई डोंगरावर गेल्या पंधरा दिवसांत पडलेल्या अतिवृष्टीमुळे सोनजाई मंदिर परिसरात असणाऱ्या विस एकर जमिनीवर अतिपावसांमुळे खरीप हंगामातील बाजरी, ज्वारी, घेवडा, मुग, सोयाबीन यातील एकही पिक न उगविल्याने मंदिर विश्वस्तांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून त्या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या लोकांचा अन्नधान्यांचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तरी वाईच्या कृषी विभागाने वाई तालुक्यातील इतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पंचनाम्याबरोबर सोनजाई डोंगरावरील मंदिर परिसरातील शेतीचा व ढासळलेल्या संरक्षण भिंतीचा पंचनामा करण्यात यावा अशी मागणी मंदिर विश्वस्तांकडून करण्यात आली आहे.
निव्वळ निसर्गावर अवलंबून असणाऱ्या सोनजाई डोंगरावर शेतीमध्ये खरीप हंगामाची पिके घेण्यात येतात यावर्षी उशिरा पावसाला सुरुवात झाल्याने मुळातच डोंगराळ पठारावरील पेरणी उशिरा झाली आहे. दुसऱ्याच दिवशी मुसळधार पावसाने सुरुवात केली ते संपूर्ण महिना या पठारावर प्रचंड पाऊस पडत आहे. त्यामुळे संपूर्ण पेरणी वाया गेली व खरीप हंगाम पाण्यात गेल्यात जमा आहे, त्यामुळे संपूर्ण वर्षभराचे आर्थिक नियोजन कोलमडले असून अन्न व जनावरांच्या चाऱ्याचा यक्ष प्रश्न उभा राहिला आहे.
तरी महसूल विभागाने कृषी विभागाला सोनजाई डोंगरावरील शेतीची पहाणी करण्यास व योग्य तो पंचनामा करण्यास भाग पाडावे व जास्तीत-जास्त भरपाई सोनजाई देवस्थानला मिळावी अशीही मागणी जोर धरत आहे. त्यातच सोनजाई मंदिराच्या बाजूची संरक्षण भिंत या पावसात ढासळली असून त्यामुळे मंदिराचे मोठे नुकसान झाले आहे.त्याचाही पंचनामा करण्यात यावा व भरीव भरपाई मिळावी. असे सोनजाई मंदिराचे विश्वस्त मंगल गिरी महाराज, तुकाराम गिरी महाराज, आनंद गिरी महाराज व सर्व विश्वस्त यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.