पुणे -पीएमपीच्या ताफ्यात येणाऱ्या 50 इलेक्ट्रिक बसेसवरची धूळ स्वातंत्र्यदिनी झटकली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ई-बसचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे.
पीएमपीकडे अपुऱ्या बसेसच्या पार्श्वभूमीवर 50 ई-बस कधीच दाखल झाल्या आहेत. मात्र, त्या भेकराईनगर येतील डेपोमध्ये धूळखात पडून आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी या बसेस रस्त्यांवर आणण्यास टाळाटाळ केली जात आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत पर्यावरणपूरक ठरणाऱ्या ई-बस घेण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. त्याअंतर्गत 500 बसेस भाडेकराराने घेण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 150, तर दुसऱ्या टप्प्यात 350 बसेसची खरेदी करण्यास संचालक मंडळानेही मान्यता दिली आहे.
यापूर्वी जानेवारीत 9 मीटर लांबीच्या बसेस दाखल झाल्या. त्यानुसार 12 मीटर लांबीच्या 50 गाड्या भाडेकराराने घेण्याची प्रक्रिया राबवण्यात आली होती. मात्र, स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी गाड्या मार्गावर आणण्याचा आग्रह माननीयांचा असल्याने त्या रस्त्यावर आणण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. प्रशासनाच्या आणि सत्ताधारी भाजपच्या या निर्णयावर प्रवासी आणि स्वयंसेवी संस्थांनी टीकेची झोड उठवली आहे.
यापूर्वी 9 मीटर लांबीच्या 25 गाड्या दाखल झाल्या, तेव्हादेखील मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने त्याचे उद्घाटन लांबणीवर टाकण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना वेळ मिळाला आणि महामेट्रोच्या कार्यक्रमातच त्यांनी ई-बसचे उद्घाटन उरकून घेतले.
पीएमपीच्या ताफ्यात 50 बसेस आल्या आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाकडे कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली असून सर्व बसेस नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
– सुनील बोरसे, मुख्य अभियंता, पीएमपीएमएल.