प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 24 – रामनदीचे पुनरूज्जीवन व्हावे, तिचा प्रवाह अविरल आणि निर्मळ व्हावा, यासाठी शालेय विद्यार्थ्यांनाही जोडून घेतले जात आहे. नदी आणि पर्यावरण रक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करावे, या उद्देशाने किर्लोस्कर वसुंधरा रामनदी अभियानाने नदीच्या काठावरील 25 शाळा दत्तक घेतल्या आहेत. त्या दत्तक शाळांद्वारे सुमारे दीड लाख शालेय विद्यार्थ्यांना या उपक्रमाशी जोडण्यास सुरूवात झाली. या उपक्रमाची मुहूर्तमेढ आज “ओळख आपल्या रामनदीची’ या दृकश्राव्य कार्यशाळेद्वारे करण्यात आली.
किर्लोस्कर न्युमॅटिक आणि रामनदी पुनरूज्जीवन अभियान यांच्या विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी किर्लोस्कर वसुंधराचे संयोजक वीरेंद्र चित्राव, डॉ. सुरेश मिजार, अनिल गायकवाड, सुवर्णा भांबुरकर, व्ही.आर.कदम, जयश्री हांडे, एन.जी.सपकाळ, शांता सबनीस यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यशाळेच्या आयोजनात शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष माधुरी सहस्रबुद्धे
आणि मंजुश्री खर्डेकर यांनी सहकार्य केले.
19.2 कि.मी.चा प्रवाह मिळतो मुळा नदीला
रामनदीला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे. नदी 19.2 किमी अंतर वाहत जाऊन शेवटी मुळा नदीला मिळते. रामनदी ही
वर्पेवाडी, खाटपेवाडी, भुकूम, भूगांव, बावधान, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, बाणेर, औंधमार्गे नदीचा प्रवाह आहे. भुकूम, भुगांव, बावधान अशा तीन ग्राम पंचायती राम नदीच्या काठावर असून बावधान ते औंध हा भाग पुणे महानगरपालिका क्षेत्रात येतो.