मोरगाव – पुरंदर तालुक्यातील नाझरे धरण हे शंभर टक्के भरले आहे. यामुळे या धरणावर पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून असलेल्या चार नळ पाणी पुरवठा योजनेवरील 40 गावांचा पाण्याचा प्रश्न वर्षभरासाठी मार्गी लागला आहे.
पुरंदर तालुक्यातील नाझरे धरण हे बारामती व पुरंदर तालुक्यासाठी पिण्याचे पाणी व शेत सिंचनासाठी संजीवनी ठरले आहे. या धरणावर शेत सिंचनासाठी नाझरे, मावडी क. प., जवळार्जुन, चोरवाडी ही पुरंदर तालुक्यातील गावे तर आंबी बुद्रूक, जोगवडी, मोरगाव (काही भाग) ही बारामती तालुक्यातील गावे शेतसिंचनासाठी अवलंबून आहेत.
त्याचप्रमाणे बारामती तालुक्यातील मोरगाव नळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर आंबी बुद्रुक, आंबी खुर्द, जोगवडी, भोंडवेवाडी, मोरगाव, तरडोली, बाबुर्डी, लोणी भापकर (वाड्यावस्त्या), माळवाडी (लोणी), काऱ्हाटी, भिलारवाडी, अंजनगाव, कऱ्हावागज (वाड्यावर) एकूण 17 गावे अवलंबून आहेत.
तसेच नाझरे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा 5 गावे, पारगाव कोळविहरे पाणीपुरवठा योजना 16 गावे, जेजुरी नगरपालिका व जेजुरी एमआयडीसी या धरणावर पाण्यासाठी अवलंबून आहेत. 16 ऑगस्ट रोजी नाझरे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने स्वयंचलीत दरवाजे सुरू झाले होते. यामुळे कऱ्हा नदी वाहू लागली होती. धरण भरल्याने वरील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न एक वर्षभरासाठी कायमस्वरूपी मिटला आहे.
उन्हाळ्यात पाण्याचे हाल
गेल्या उन्हाळ्यामध्ये अतिशय टंचाईग्रस्त अवस्था या भागात पाण्याअभावी निर्माण झाली होती. तसेच टॅंकर सुरू करण्यात आले होते. मृत पाण्यातून तब्बल सहा दिवसांनी नळ पाणीपुरवठा पुरंदर व बारामती तालुक्यातील गावांना केला जात होता. मात्र धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने तालुक्याच्या जिरायती भागातील गावांची पाण्यासाठी होणारी वाताहत थांबणार आहे.