अलीगड – हाथरस येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात महिलांवरील वाढते अत्याचार आणि मानवी हक्कांच्या भंगांचे वाढते प्रमाण याच्या विरोधात अलीगड मुस्लीम विद्यापीठाचे विद्यार्थीही रस्त्यावर उतरले होते. त्यांनी त्या परिसरात रात्री मशाल मोर्चा काढला होता.
त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकार बरखास्त करण्याची मागणी करणारे निवेदन राष्ट्रपतींच्या नावे लिहिले असून त्यांनी ते जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
बलात्कार प्रकरणात फाशीची शिक्षा देणारा कायदा करावा आणि त्या प्रकरणांच्या त्वरित सुनावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात जलदगती न्यायालय स्थापन करावे, अशी मागणीही त्यांनी या निवेदनात केली आहे.
उत्तर प्रदेशातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्था स्थितीबाबत विद्यार्थ्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे, त्यांनी म्हटले आहे की, नॅशनल क्राईम ब्युरोने सन 2019 ची जी आकडेवारी जाहीर केली आहे त्यात उत्तर प्रदेशातील गुन्ह्यांच्या संख्येचे प्रमाण सर्वाधिक असल्याची बाब नोंदवण्यात आली आहे.
महिलांवरील अत्याचाराच्या घटनेचे उत्तर प्रदेशातील प्रमाण 20 टक्क्यांनी वाढल्याचेही त्या अहवालात नमूद करण्यात आल्याचे त्या विद्यार्थ्यांनी निदर्शनाला आणून दिले आहे.