संगमनेर – म्हाळुंगी नदीवरील श्री स्वामी समर्थ मंदिरापासून ते संतोषी माता मंदिरापर्यंत असलेला पूल खचून वर्ष झाले. पूल धोकादायक झाल्याने त्यावरून वाहतूक पूर्णपणे बंद आहे. पुलाच्या काम संदर्भात वारंवार मागणी करून कोणतीही दखल घेतली नाही. नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे गुरुवारी स्थानिक नागरिकांसह विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून नगरपालिकेच्या मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक, आणि प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन लक्ष वेधले. यावेळी मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दोन महिन्यानंतर काम सुरू होणार असल्याचे सांगितले.
शहरातील रंगार गल्लीपासून पुढे गेल्यानंतर म्हाळुंगी नदीचा पूल ओलांडला असता, साईनगर, संतोषी माता मंदिर, पंपिंग स्टेशन, घोडेकर आणि म्हाळस मळा परिसर आहे.तसेच साई मंदिराशेजारी देवेंद्र अमृतलाल ओहरा कनिष्ठ महाविद्यालय आहे. या सर्व परिसराला जोडणारा म्हाळुंगी नदीवरील पूल खचून वर्ष झाले.
सहा महिन्यांपूर्वीही आंदोलन केले असता फक्त आश्वासने मिळाली, मात्र प्रत्यक्षात काम सुरू झाले नसल्याने आज गुरुवारी स्थानिक शेकडो नागरिकांसह विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पालिकेत सध्या प्रशासकांचे राज्य असल्याने गेल्या सहा महिन्यांत याबाबत कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले असून त्यांनी आज सकाळी एकत्र येवून नवीन पूल करावा अशी मागणी करण्यात आली. नगर पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी प्रसिद्धीपत्रक काढून जर नवीन पुलाचे अंदाजपत्रक व नकाशे यात छाननी अंती बदल झाले नाही तर तांत्रिक मान्यता प्रक्रिया 20 ऑक्टोबर अखेर पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे सांगितले.