प्रख्यात सीने निर्माता कबीर खान याने व्यक्त केली अस्वस्थता
नवी दिल्ली : विद्यार्थी हे देशातील तत्वाधिष्ठित समुह असतात, त्यांचा आवाज दाबणे म्हणजे लोकशाहीचा मृत्यू आहे, असे मत सीने निर्माता कबीरखानने व्यक्त केले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयु) बुरखाधारी टोळक्याने केलेल्या विद्यार्थ्यांवर केलेल्या हल्ल्याने अस्वस्थ झालेल्या कबीर खान यांनी हे मत व्यक्त केले आहे.
जामिया मिलिया आणि अलिगढ विद्यापीठात झालेल्या हिंसाचारासंदर्भात त्यांना हा विद्यार्थ्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होता का? असे विचारता कबीर खान म्हणाले, त्यांनी आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना ते अद्याप जमले नाही.
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत जेएनयुचे संस्थापक सदस्य असणाऱ्या रशीदुद्दीन खान यांचे चिरंजीव असाणारे कबीर खान म्हणाले, विद्यापीठावरील असे होणारे हल्ले अत्यंत अस्वस्थ करता. म्हणूनच मी बोलायचे ठरवले. हॅंडस् अप करत जामियातील विद्यार्थी चालतानाचे दृश्य पाहून माझ्या मनाला अत्यंत वेदना झाल्या. हे घडायला नको होते, असे मला वाटले. तुम्ही कोणत्याही प्रकारची चर्चा करा, मात्र विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यापासून रोखू शकत नाही. तुम्ही तसे कराल तर तो लोकशाहीचा मृत्यू ठरेल.
विद्यार्थ्यांचा आवाज बंद करण्यापेक्षा त्यांच्याशी कोणी तरी संवाद साधायला हवा. वयोमानाप्रमाणे आपण काहीसे भ्रष्ट बनतो. राजकारणापासून दूर होतो, मात्र विद्यार्थी तत्वाला चिकटून राहतात. तुम्ही विद्यार्थ्यांना उभे राहून बोलू देत नसाल तर या देशात काही तरी चुकत आहे. त्यांच्या आंदोलनात काही चुकीचे आहे, असे तुम्हाला वाटत असेल तर जरूर त्यांच्याशी बोला, चर्चा करा, असेही न्युयॉर्क आणि बजरंगी भाईजान असे राजकीय संदेश देणाऱ्या चित्रपटाचा हा निर्माता म्हणाला.
तुम्ही सत्तेचा आणि पोलिसांचा त्यांच्या विरोधात वापर करू शककत नाही. ग्रंथालय आणि वर्गखोल्यांमधून खेचून तुम्ही त्यांना मारहाण करू शकत नाही. हे खूपच भयानक आहे. तुम्ही विद्यार्थ्यांवर असे हल्ले करत असाल तर तुम्ही स्वत: तुमच्या देशाचे भविष्य पुसत आहात, असे ते म्हणाले.
हे सरकार विद्यार्थ्यांना का घाबरते?असे विचारता ते म्हणाले, समाजात विद्यार्थी हा खूप शक्तीशाली घटक आहे, याची सत्ताधाऱ्यांना जाणीव आहे. विद्यार्थी जर एकत्र आले तर ते वणव्याप्रमाणे आग लावू शकतात, याची त्यांना कल्पना आहे. कदाचित त्यांना ज्याची भिती वाटते, तेच आता घडत आहे. तुम्ही एक विद्यापीट गप्प करायला जाता त्यावेळी दुसरे विद्यापीठ उभे रहात आहे.
ज्यावेळी जेएनयुत हल्ला झाला त्यावेळी मुंबईतील विद्यार्थी उभे राहिले. जामियातील विद्यार्थी आयटीओ चौकात निदर्शन करते झाले. जामियाला गप्प केले त्यावेळी जेएनयु उभे राहीले. हे घडत आहे. तुम्ही विद्यार्थ्यांचा विद्रोह कसा दाबणार? तो त्यांचा जन्मसिध्द हक्क आहे. हीच तर लोकशाही आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.