सविंदणे, (वार्ताहर)- शिरूर -पुणे रस्त्यावर शिरूरजवळील बोऱ्हाडे मळ्यात मालवाहतूक करणारी एसटी महामंडळाची मालट्रक (महाकार्गो बस) जळून खाक झाली. यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. शुक्रवारी (दि. ९) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर तीन तासांहून अधिक काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाल्याने वाहनांची रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती.
पिंपरी- चिंचवड आगाराची ही महाकार्गो बस चाकण येथून ऑईलचे बॅरेल व काही स्पेअर पार्ट भरून छत्रपती संभाजीनगर येथे चालली होती. ही बस बोऱ्हाडे मळ्याजवळ आली असताना मागील बाजूने गरम वाफा येऊ लागल्याने चालक सत्यवान उत्तम तळेकर यांनी बस रस्त्याकडेला घेतली. त्यावेळी मागील बाजू ज्वालानी वेढल्याचे त्यांना दिसल्याने त्यांनी उडी टाकून मदतीसाठी आसपासच्या लोकांना हाका मारल्या.
मात्र, ऑइलसह इतर ज्वलनशील पदार्थ या बसमध्ये असल्याने आगीचे मोठे लोळ उठले होते. त्यामुळे कुणीही पुढे जाण्याचे धाडस केले नाही. दरम्यान, शिरूर पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी रांजणगाव एमआयडीसी व शिरूर नगरपरिषदेशी संपर्क साधल्यानंतर आगीचे बंब घटनास्थळी दाखल झाले. शिरूरमधील सागर वॉटर सप्लायर्स, संपत दसगुडे यांनीही ट्रॅक्टरला जोडलेल्या पाण्याच्या टँकरने पाण्याचा मारा केला. मात्र, कार्गोमधीलऑईलमुळे सुमारे दीड तासाहून अधिक काळ आग भडकत होती. त्यामुळे कार्गो जळून खाक झाली. आग आटोक्यात आणल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. त्यावेळी कार्गोचा केवळ सांगाडाच उरला होता.
दरम्यान, आगीचे लोळ परिसरात उठत असल्याने नगर महामार्गावरील एका बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. विस्कळित वाहतुकीमुळे आगीचे बंब घटनास्थळी पोहोचण्यासही विलंब झाला. आग आटोक्यात आणल्यानंतर उरलेला सांगाडा बाजूला करण्यातही बराच वेळ गेला. त्यामुळे सकाळी साडेनऊपर्यंत वाहतूक विस्कळीत झाली होती. सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव, पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील यांनी पोलीस पथकासह वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले.