उंब्रज -गरीबीचे चटके सहन करत, दारिद्रयाशी झगडत, पोराबाळांना सोन्याचे दिवस दाखवले ज्याला आपण मध्यमवर्गीय सुखी कुटुंब म्हणतो, त्यांची ही वेदना महामारीच्या काळात हसऱ्या चेहऱ्यावर मास्क लावून दुःख लपवण्याची त्याची धडपड जीवघेणी अशीच आहे.
सामान्य कुटुंबातील अनेकांनी आजपर्यंत अनेक अस्मानी, सुलतानी संकटे पाहिली. पूर पाहिले, धुर पाहिले, दुष्काळात होणारे हालही पाहिले. पण एकाच वेळी असं साऱ्या जगावर आलेल संकट त्यांनी पहिल्यादांच पाहिलेयं. यापूर्वी एकाद्या व्यक्तीवर संकट आलं, तर कुटुंब, भावकी, गाव, राज्य, देश असं कोण ना कोण तरी मदतीला धावत होतंच. पण या महामारीने ही सारी गणितचं बिघडवून गेली.
या परीस्थितीत सर्वसामान्यांनी मदत मागावीतर कुणाकडे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. समोरचाच फाटका झालायं, तर मदत मागणार कशी? देव तर देवळात बंद आहेत. शिवाय, आजपर्यंत देवासारखे मदतीला धावून येणारेही मदतीसाठी दुसऱ्याकडे बघत आहेत.
या सगळ्यात कुचंबना होत आहे ती मध्यमवर्गीयांची. त्यांच्या हाताला काम नाही. पुढे मिळेल याची शाश्वती नाही. त्यात जवळ काही शिल्लक नाही. या सगळ्यात प्रपंचा कसा सावरावा, हेही त्याला कळेनासे झाले आहे. अशा अवघड परिस्थितीत मोफत जीवनावश्यक वस्तू देणारे काहीजण आहेत. पण त्यातही दोन-चारजण प्रसिद्धीसाठी फोटो घेण्यात दंग आहेत. त्यामुळं इतके दिवस आत्मसन्मानाने जगलेल्या या मध्यमवर्गीय मंडळींची अवस्था धड सांगताही येईना, आणि सहनही होईना, अशी झाली आहे. पण हा आत्मसन्मान भुकही भागवेना अन् भिकही मागू देईना, अशा द्विधा मनस्थितीत तो येऊन बसलायं. इतके दिवस आत्मसन्मानाने जगणाऱ्याला घरात सर्वांसमोर जाताना मान खाली घालून बसावे लागतेय. येणाऱ्या काळाच्या विचारांनी डोळ्यात येणारं पाणी दडवताना रोज कसरत करतो आहे.
आहो..! ऐकलतं का? हा शब्द ऐकताना पूर्वी त्याला बरं वाटायचं. पण, लॉंकडाऊनमध्ये रोजगार बंद झाला. मग आवकही बंद झाल्याने आता फक्त बसून खानं चालू आहे. यातच “आहो’ हा शब्द कानावर पडताच पोटात भीतीचा गोळा येऊ लागलायं. चेहऱ्यावर हास्य ठेवून जड अंतःकरणाने बाहेर पडताना मोकळी पिशवीपण भरल्यासारखी वाटू लागतेय. तेंव्हा मात्र जिवाची तगमग होतेय. मग डोळ्यांच्या कडा पाणावल्या तर तोंडाला लावायच्या मास्कनेच ते तो पुसतो आहे. अपेक्षांची भलीमोठी यादी घेऊन बाहेर पडतोय. दुकानात माल आहे. पण उधार कोणी देत नाही. दहा-वीस किलोने घेणारा आता किलो, पावशेरवर आली आहेत. हे दुःख आता उराशी आहे.