श्रीगोंदा -तालुक्याच्या बहुतांश भागात पावसाने रविवारी (दि.31) दमदार हजेरी लावली. पावसाळ्याची सुरुवात दमदार झाली असून, शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. मागील काही वर्षांत ‘उन्हाळ्यात जगतं अन् पावसाळ्यात जळतं’ असाच काहीसा कटू अनुभव तालुक्यातील शेतकऱ्यांना येत होता. उन्हाळ्यात मोठ्या कष्टाने पाणी घालून जगवलेली पिके पावसाळा लांबल्याने ऐन पावसाळ्यात जळत असल्याची भीषण स्थिती निर्माण होत होती.
यावर्षी मात्र पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाने जवळपास संपूर्ण तालुक्यात दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले. रविवारी सायंकाळी व रात्री अनेक भागांत संततधार पाऊस झाला. ज्या शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासू लागली होती, त्यांना या पावसाने मोठा आधार मिळाला आहे.
तालुक्यात झालेल्या पावसाची मंडलनिहाय आकडेवारी अशी ः श्रीगोंदा शहर- 31 मिमी, कोळगाव- 35 मिमी, मांडवगण- 48 मिमी, देवदैठण 35मिमी, बेलवंडी- 66 मिमी, चिंभळे- 27 मिमी, काष्टी- 46 मिमी, पेडगाव 11मिमी. तालुक्यात एक दिवसात सरासरी 37.37 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे काही काळ वातावरणात गारवा पसरला होता.
राजकीय मुद्यावर पावसाने फिरवले पाणी
तालुक्यात विशेषतः ‘कुकडी’च्या लाभधारक पट्ट्यात शेतकऱ्यांना पाण्याची चांगलीच कमतरता भासू लागली होती. ‘कुकडी’चे पाणी मिळावे, या मुद्द्यावरून तालुक्यात राजकारण पेटले होते. राजकीय नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. नेतेमंडळी पाण्याच्या राजकारणात गुंतल्याने अखेर निसर्गानेच शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवला. एवढेच नव्हे, तर नेत्यांच्या पाण्याच्या राजकीय मुद्द्यावर निसर्गानेच पाणी फिरवले, अशी बोलकी प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये उमटत होती.