पुणे – कामगारांचे अधिकार काढून त्यांच्यावर अन्याय करण्याचे काम हे भाजप सरकार करत असून कामगार, शेतकरी, गोरगरिबांना न्याय देण्याऐवजी त्यांच्यावर अन्याय करत आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आघाडी सरकार आल्यानंतर कामगारांच्या न्याय्य-हक्क आणि आरोग्यासाठी प्रयत्न केले जातील. बेरोजगारांना रोजगार देऊन कामगारांच्या सुरक्षेसाठी प्रयत्नशील राहील, असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात दिले.
महाआघाडीच्या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार अश्विनी कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात सुळे बोलत होत्या. यावेळी कष्टकरी पथारी व्यवसाय पंचायत व हमाल पंचायत आणि श्री छत्रपती शिवाजी कामगार युनियन मार्केटयार्ड यांनी महाआघाडीला पाठिंबा दिला.
खासदार वंदना चव्हाण, महेश शिंदे, संतोष नांगरे, पथारी पंचायतचे बाळासाहेब मोरे, हमाल पंचायतचे नवनाथ बिनवडे, कामगार युनियन आप्पा कुडले, गोरख मेगडे, संदीप धायगुडे, संदीप मारणे, राजेंद्र चोरगे, संपत सुकाळे, रिक्षा पंचायतचे एस.वाघमारे यांच्यासह संघटनाचे पदाधिकारी आणि महाआघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सुळे म्हणाल्या, आघाडीची सत्ता असताना राज्यासह पुणे शहरातही हॉस्पिटल व इतर आरोग्याच्या सुविधा चांगल्या दिल्या. सहकारनगर येथील अत्याधुनिक सुविधांयुक्त महापालिकेच्या माध्यमातून उभारलेल्या पोटे रुग्णालयात संपूर्ण एमआरआय अल्पदरात केला जातो आणि चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत.
पर्वती भागातील स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या शिक्षिका उमेदवार अश्विनी कदम यांचे तीन वेळा नगरसेविका म्हणून काम पाहिले असून त्यांना मनपा स्थायी समिती अध्यक्ष असताना कामाचा अनुभव आहे.
याचा जनता विचार करून येणाऱ्या काळात त्या निश्चित निवडून येतील, असा विश्वास सुळे यांनी व्यक्त केला. तर, खासदार चव्हाण यांनी शपथनामा जाहीर करून यातील प्रमुख मुद्दे सांगत कामगारांच्या कल्याणासाठी त्यांच्या न्याय्य-हक्कांसाठी कटिबद्ध राहू, असा विश्वास व्यक्त करून हा जाहीरनामा नसून शपथनामा आहे, असे सांगून शपथनामा वाचून दाखवला. नितीन कदम यांनी भावनिक आवाहन करत या निवडणुकीसाठी साथ देण्याचे आवाहन केले.