विनोद पोळ
दोन वेळा पंचानामे करुनही नुकसान भरपाईसाठी प्रतीक्षाच
कवठे – जुलै, ऑगस्ट महिन्यांमध्ये मान्सूनच्या अतिवृष्टीने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान केले. विशेष म्हणजे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह कराड, पाटण तालुक्यात महापुराने अक्षरश: गावे उद्ध्वस्त झाली. या पावसाने जिल्ह्यातील माण-खटाव वगळता सर्वच तालुक्यात प्रचंड नुकसान झाले.
विशेषत: शेतीची मोठ्या प्रमाणात हानी झाली. त्यानंतर शासनाने नेहमीप्रमाणे नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांकडून अर्ज भरुन घेतले. दीड-दोन महिने उलटले तरी ही मदत संबंधितांना मिळाली नाही. पुन्हा परतीच्या पावसाने नुकसाने त्याचेही आता पंचनामे सुरु असल्याने “पैसा न अडका अन् पंचनाम्यासाठी शिवाराला धडका’ असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून दोन-दोन वेळा पंचनामे होऊनही शेतकऱ्यांना भरपाईसाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे.
राज्यात सर्वत्र अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी व तहसीलदारांनी दिले आहेत. त्यानुसार अतिवृष्टीमुळे व परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे अशा ठिकाणी पिकांचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सदर पंचनामे करताना फोटो व व्ही.डी.ओ. करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यासाठी मा. आयुक्त हे जिल्हा दौरा करणार आहेत. त्यामुळे प्रत्येक गावातील महसूल यंत्रणा, ग्रामसेवक, तलाठी व कृषी विभाग अधिकाऱ्यांची धावपळ सुरु आहे. मात्र यामध्ये ऑगस्ट महिन्यापर्यंत ज्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत, अशांचे फेरपंचनामे केले जात नाहीत. तात्काळ पंचनामे उरकावेत हा जरी शासनाचा हेतू असला तरी ऑगस्ट महिन्यामध्ये पिके परिपक्व झाली नव्हती, त्यामुळे त्या वेळेस झालेले पिकांचे नुकसान व आत्ताची पिकांची परिस्थिती यात जमीन अस्मानाचा फरक आहे.
मग अशावेळी ऑगस्ट महिन्यात केलेल्या पंचनाम्यातील बाधित शेतकऱ्यांचे आत्ता परतीच्या पावसात जर संपूर्ण पिक वाया गेले असेल तर त्याला ऑगस्ट महिन्यात झालेल्या पंचनाम्यानुसारच नुकसान भरपाई मिळणार की आता अंदाजे नुकसान पकडणार हा प्रश्न असल्याने या शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
दिवाळी अगोदर पंचनामे होवूनसुद्धा नुकसानभरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी दिनवाणी परीस्थित झाली आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या पंचनाम्यानुसार 30 टक्क्यापेक्षा कमी बाधित क्षेत्र व 30 टक्क्यापेक्षा जास्त बाधित क्षेत्र अशा दोनच प्रकारात नुकसानीचे वर्गीकरण केले होते. आत्ता परतीच्या पावसाने मात्र या टक्केवारीत नक्कीच फरक पडणार असल्याने ऑगस्ट महिन्यापर्यंत ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेत त्यांना किती व कशी नुकसान भरपाई मिळणार याबाबत शेतकरी वर्गातून साशंक चर्चा आहे.
शेतात पाणीच पाणी असल्याने शेतापर्यंत मळणी मशीन पोहोचू शकत नसल्याने शेतकऱ्यांना अक्षरशः डोक्यावरून आपली पिके दूर अंतरावरून महामार्गाच्या सेवारस्त्यावर मळणीसाठी आणावी लागत आहेत. मळणी मशीन येईपर्यंत पुन्हा आलेल्या मुसळधार पावसाने पुन्हा हातातोंडाशी आलेला घास भिजून वाया गेला आहे. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने सरसकट सर्वच शेतकऱ्यांना पिक प्रकारानुसार भरपाई द्यावी.
शशिकांत करपे, प्रगतशील शेतकरी, कवठे.