केंद्रीय पद्धतीने प्राध्यापक भरती करा, विद्यार्थी परिषदेची मागणी
बारामती – केंद्रीय पद्धतीने प्राध्यापक भरती करण्यात यावी, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी येथील तहसील कार्यालयात घुसून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. यावेळी संतप्त विद्यार्थ्यांनी निषेध नोंदविला. याबाबतचे निवेदन तहसीलदार विजय पाटील यांना देण्यात आले.
प्राध्यापक भरती केंद्रीय पद्धतीने करण्यात यावी, यासंदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडे मागणी करीत आहे. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या बारामती येथील सदस्यांनी थेट तहसील कार्यालयात घुसून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. प्राध्यापक भरती केंद्रीय पद्धतीने करण्यात यावी, 100 टक्के प्राध्यापक भरतीला राज्य शासनाने परवानगी द्यावी.
महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठ परिसरातील 100 टक्के पदभरती करण्यात यावी, पीएच. डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य शासनातर्फे फेलोशिप सुरू करण्यात यावी, महाराष्ट्रभर एकाचवेळी प्राध्यापक भरती करण्यात यावी, प्राध्यापक भरती ही केंद्रीय पद्धतीने घेण्यात यावी, असे जिल्हा संयोजक वैभव सोलनकर यांनी सांगितले. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार संपुष्टात यावा यासाठी बारामती तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्री यांनी जर तोडगा काढला नाही तर विद्यार्थी परिषद तीव्र आंदोलन करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी अभाविपचे बारामती जिल्हा संयोजक वैभव सोलनकर, अक्षय मोरे, अक्षय नाळे, समीर मारकड, बाळासाहेब सोलनकर, शशीकांत टिंगरे, प्रीतम नाळे, अनिकेत बंडलकर, अक्षय खोमणे, गणेश गाडवे आदी विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.