नगर | भारत निवडणूक आयोगाच्या वतीने लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करण्यात आल्यापासून आदर्श आचारसंहिता जारी झाली आहे. जिल्ह्यातील दोन्हीही लोकसभा मतदारसंघात भारत निवडणूक आयोगाला अपेक्षित आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करा. दिलेल्या जबाबदारीमध्ये कोणीही कसूर करू नका. असे निर्देश निवडणुकीशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमाठ यांनी दिले. तसेच आदर्श आचारसंहितेचे पालन सर्व घटकांनी करावे. नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई अटळ आहे. कारवाईची वेळ येणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली आचारसंहिता अंमलबजावणीच्या संदर्भात लोकसभा निवडणुकीची संबंधित असलेल्या अपर जिल्हाधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी, तहसीलदार पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि यंत्रणे निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व यंत्रणांचे अधिकारी विभाग प्रमुख यांची बैठक सोमवारी (दि.१८) झाली.
या बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात संवाद साधला असता जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर,जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील, निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, राहुरी विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे, महसूल उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, बालाजी क्षीरसागर, तहसीलदार प्रदीप पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, भारत निवडणूक आयोगाने निर्देशित केलेल्या आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने निवडणुकीशी संबंधित सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार पोलीस यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी यांना मार्गदर्शन करण्यात आले.
आचारसंहितेचे उल्लंघन झाल्या प्रकरणी तक्रार नोंदवण्यासाठी सिव्हिजील ॲप भारत निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करून देण्यात आले आहे. या ॲपवर तक्रार दाखल झाल्यानंतर १०० मिनिटात त्यासंबंधी रिपोर्ट देणे अपेक्षित आहे. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणी संदर्भात दिलेल्या जबाबदारी बिनचूकपणे पार पाडा.कोणीही चुका करू नका. विनाकारण चुकीची माहिती देऊन दिशाभूल केल्याचे आढळल्यास त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे देखील त्यांनी सांगितले. या बैठकीत आदर्श आचारसंहितेच्या संदर्भातील नियम आणि मुद्दे याचे सविस्तर सादरीकरण उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे यांनी केले.