लातूर – गेल्या चार दिवसांपासून लातूर जिल्ह्यातही करोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. दिवसाला 100 रुग्णांची भर पडत असल्याने आता निर्बंध लादण्यास सुरवात झाली आहे.
त्यानुसारच जिल्ह्यातील शाळा- महाविद्यालये तसेच खासगी कोचिंग क्लासेसही सोमवारपासून बंद राहणार आहेत. खासगी कोचिंग क्लासेस करिता सबंध मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने विद्यार्थी दाखल झालेले असतात. मात्र, वाढती रुग्णसंख्या पाहता जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांनी नवे आदेश काढले असून 15 फेब्रुवारी पर्यंत हे शाळा महाविद्यालये आणि खासगी क्लासेस बंद राहणार असल्याचे सांगितले आहे.
सोमवारपासून रात्रीची संचारबंदी आणि दिवासाची जमाव बंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार अंमलबजावणीच्या पहिल्या दिवशी मनपा आणि पोलीस प्रशासनातील कर्माचारी नियमांची अंमलबजावणीसाठीचे प्रयत्न करीत होते. आतापर्यंत केवळ तोंडी नियम सांगतिले जात होते. पण आता मास्क न घातल्यास 500 दंड आकारण्यास सुरवात झाली होती. शिवाय सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.
लातूर शहरात क्लासेस करिता 15 ते 20 हजार विद्यार्थी वास्तव्यास असतात. मात्र, गेल्या दीड वर्षापासून करोनाच्या संकटामुळे कधी नव्हे ते क्लास देखील ऑनलाइनच्या माध्यमातून घ्यावे लागत आहेत. गतवर्षीही शहरातील सर्वच क्लासेस चालकांनी नियमांची अंमलबजावणी करीत ऑनलाईन पध्दतीचा स्वीकार केला होता. आता पुन्हा हीच पध्दत अवलंबवावी लागणार असून शहरातील मुख्य रस्त्यांवर पुन्हा शुकशुकाट पाहवयास मिळणार आहे.