सोलापूर : राज्यात दुसरी लाट ओसरत आहे असे वाटत असतानाच आता पुन्हा एकदा राज्यात काही ठिकाणी लॉकडाऊनचे संकट उभे राहिले आहे. आजपासून सोलापुरातील पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा आणि सांगोला या पाच तालुक्यात संचारबंदी लागू होत आहे. या संचारबंदीला व्यापाऱ्यांचा मात्र विरोध आहे.
पंढरपूर व्यापारी महासंघाने संचारबंदीचे आदेश धुडकवात काळे झेंडे लावून दुकानं सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे व्यापारी आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे. पुण्यातील करोना निर्बंधांबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या तालुक्यांचा उल्लेख करत येथील वाढत्या करोना प्रादुर्भावाबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने या तालुक्यांमध्ये संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला.
सोलापूर जिल्ह्यातील 5 तालुक्यात 13 ऑगस्टपासून, म्हणजेच आजपासून पुढील आदेशापर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील माढा, माळशिरस, कसमाळा, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्ह्या प्रशासनानं हे नवे आदेश लागू केले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील या तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
संचारबंदीत काय सुरु, काय बंद?
सोलापूर जिल्ह्यातील माढा, माळशिरस, करमाळा, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यात कडक निर्बंध
13 ऑगस्टपासून अत्यावश्यक सेवांची दुकानं दुपारी 4 पर्यंत सुरु राहणार
अत्यावश्यक सेवांमध्ये नसलेली दुकानं पूर्णपणे बंद
कोणतेही मेळावे, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांवर बंदी
विवाह सोहळ्यास 50 ऐवजी 25 लोकांना परवानगी
अत्यावश्यक, वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्वांसाठी पाच तालुक्यात पूर्णपणे संचारबंदी लागू
* खासगी आणि सार्वजनिक, प्रवासी वाहतूक तसेच माल वाहतूक सुरु