मंगळवारच्या बैठकीत दिसणार ताकद; खा. रणजितसिंह, आ. शिवेंद्रराजे, आ. गोरे खिंड लढवणार?
संतोष पवार
सातारा – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याने जिल्हा नियोजन समितीतही महाविकास आघाडीच्या दिग्गजांची तगडी फौज दिसणार आहे. ना. रामराजे नाईक निंबाळकर, ना. बाळासाहेब पाटील, ना. शंभूराज देसाई, खा. श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीचे उर्वरित चार आमदार अशी ताकद मंगळवारी होणाऱ्या नियोजन समितीच्या बैठकीत दिसणार आहे. भाजपचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. शिवेंद्रराजे भोसले आणि आ. जयकुमार गोरे महाविकास आघाडीच्या दिग्गजांपुढे टिकून खिंड लढवणार का? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
सातारा जिल्ह्यावर पहिल्यापासून दोन्ही कॉंग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. गेल्या काही वर्षात तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा बॅंक, कृषी उत्पन्न बाजार समिती आदी महत्वाच्या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकी बरोबर सातारा लोकसभेची पोटनिवडणूकही झाली. या निवडणुका दोन्ही कॉंग्रेसने एकत्र तर भाजप – सेनेने युतीच्या माध्यमातून लढवल्या होत्या. लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांना पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत श्रीनिवास पाटील यांनी मोठ्या मताधिक्क्याने विजयश्री खेचून आणली.
कराड उत्तर मधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बाळासाहेब पाटील, कराड दक्षिणमधून कॉंग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, पाटणमधून शिवसेनेचे शंभूराज देसाई, फलटणमधून राष्ट्रवादीचे दीपक चव्हाण, वाईमधून राष्ट्रवादीचे मकरंद पाटील, कोरेगावमधून शिवसेनेचे महेश शिंदे विजयी झाले. विधान परिषदेवर आ. आनंदराव पाटील यांची यापूर्वीच वर्णी लागलेली आहे. तर सातारा – जावळीतून भाजपचे आ. शिवेंद्रराजे भोसले, माण -खटावमधून जयकुमार गोरे विजयी झाले.
निवडणुकीनंतर राज्यात घडलेल्या सत्ता नाट्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. या सरकारच्या मंत्रीमंडळात बाळासाहेब पाटील यांना कॅबिनेट तर शंभूराज देसाई यांना राज्यमंत्रीपद मिळाले. त्यामुळे नियोजन समितीत ना. पाटील, ना. देसाई, ना. रामराजे नाईक निंबाळकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खा. श्रीनिवास पाटील व महाविकास
आघाडीचे अन्य चार आमदार अशी तगडी फौज असणार आहे. महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील मंत्री व आमदार अनुभवी आहेत याऊटल भाजपचा एक खासदार आणि दोनच आमदार असल्याने सद्य परिस्थितीत तरी नियोजन समितीत महाविकास आघाडीचाच बोलबाला दिसणार असल्याचे चित्र आहे. एकीकडे जिल्हा नियोजन समितीत महाविकास आघाडीच्या दिग्गजांची तगडी फौज आहे तर दुसरीकडे माढा लोकसभा मतदारसंघाचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, सातारचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, माणचे आमदार जयकुमार गोरे असणार आहेत. महाविकास आघाडीच्या तुलनेत भाजपकडे नियोजन समितीत संख्याबळ कमी असले तरी एक खासदार व दोन आमदार महाविकास आघाडीला जेरीस आणू शकतात अशीही चर्चा आहे. सरकार स्थापनेनंतर मंगळवारी पहिलीच जिल्हा नियोजन समितीची बैठक होत असून या बैठकीत कोणाची ताकद दिसणार? संख्याबळ कमी असले तरी कोण खिंड लढवणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
रणजितसिंह, शिवेंद्रराजे, जयकुमार आक्रमक होणार?
आ. शिवेंद्रराजे भोसले आणि आ. जयकुमार गोरे हे दोघेही अनुभवी आहेत. त्यामुळे नियोजन समितीच्या बैठकीत त्यांचा अनुभव पाहावयास मिळणार आहे. भाजपकडे सत्ता नसल्याने दोघांनाही आक्रमक भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यांना खा. रणजितसिंह निंबाळकर यांचीही साथ मिळणार असल्याने डीपीसीत विरोधक आक्रमक होणार की सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेणार हे मंगळवारीच स्पष्ट होणार आहे.