सातारा -पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत हवामान आधारीत फळपीक विमा योजनेमध्ये स्ट्रॉबेरीचा समावेश करण्याची शेतकऱ्यांची मागणी होती. त्यासाठी कृषी विभागाने पाठपुरावा केल्याने स्ट्रॉबेरीचा समावेश फळपीक विमा योजनेत या वर्षापासून करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी गुरुवारी दिली.
यंदाच्या वर्षी करोनामुळे स्ट्रॉबेरीच्या उत्पादन व विक्रीवर मोठा परिणाम झाल्याने महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यांना या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी व महाबळेश्वर या महसूल मंडळातील भात पिकाचादेखील समावेश पंतप्रधान पीक विमा योजनेत करण्याची शेतकऱ्यांची मागणी होती.
त्याचाही पाठपुरावा कृषी विभागाने केला. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामापासून महाबळेश्वर व पाचगणी महसूल मंडळातील भात पिकाचाही समावेश पीक विमा योजनेत करण्यात आला आहे.
फळपीक विमा योजनेत जिल्ह्यातील चार हजार 902 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला असून दोन हजार 422 हेक्टर क्षेत्र संरक्षित करण्यात आले आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेत जिल्ह्यातील 26 हजार 406 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला असून सुमारे 10 हजार हेक्टर क्षेत्र संरक्षित करण्यात आले आहे, अशीही माहिती राऊत यांनी दिली.