लखनौ : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद शहरात राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याच्या घरावर दरोडा पडला. नेहमी प्रमाणे चोरटयांनी ऐवज चोरून तर घेऊन गेलाच पण त्यानंतर त्यांनी केलेली कृती ही सध्या चर्चेचा विषय बनली आहे. सर्व लुटारुंनी त्या वृद्ध जोडप्याच्या पायाला स्पर्श केला आणि 500 रुपये दिले. तसेच, सहा महिन्यांत लुटलेली संपूर्ण रक्कम आणि दागिने परत करु, असे आश्वासन देखील त्यांनी दिले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र वर्मा आणि त्यांची पत्नी अरुणा वर्मा हे वृद्ध दाम्पत्य माजी महापौर आशु वर्मा यांच्या बंगल्याजवळ राजनगर सेक्टर 9 मध्ये राहतात. बुलंदशहर रोड औद्योगिक क्षेत्रात या जोडप्याचा कारखाना होता, मात्र कोरोना काळात त्यांना तो बंद करावा लागला होता. या जोडप्याला तीन विवाहित मुली आहेत. त्या तिघीही परदेशात राहतात.
सोमवारी रात्री उशिरा 3.30 वाजताच्या सुमारास चार चोरांनी गॅस कटरने लोखंडी गेट कापले आणि नंतर काच फोडून त्यांच्या घरात प्रवेश केला. जोडप्याच्या माहितीनुसार, एका बदमाशच्या हातात पिस्तूल होते, तर तिघा जणांकडे चाकू होते. दरम्यान, चोरटयांनी या वृद्ध दाम्पत्यांस पिस्तुलाचा धाक दाखवत घरातील ऐवज लुटला.
दाम्पत्याला ओलीस घेऊन चोरट्यांनी दीड लाख रुपयांची रोकड आणि चार लाखांचे दागिने लुटले. दरोडेखोर निघण्यापूर्वी वृद्ध दाम्पत्याच्या पाया पडले आणि त्यांनी दोघांची माफी मागत म्हणाले, हे आम्ही मजबुरीमध्ये काम करत आहोत. तसेच पुढील सहा महिन्यांत व्याजासह पैसे आणि दागिने परत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. निघताना जोडप्याला 500 रुपयेही दिले. याची माहिती मिळताच कवीनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले, गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला.