मुंबई : महापालिकेच्या माजिवाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने शहरातील फेरीवाल्यांविरोधात मंगळवारपासून जोरदार कारवाईला सुरुवात केली. दरम्यान, आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कल्पिता पिंपळे यांची रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली. दरम्यान, त्यांनी काळजी घ्या, फेरीवाल्यांचं काय ते बघू, असे म्हटले. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर देखील उपस्थित होते.
बाळा नांदगावकर म्हणाले, “अशाप्रकारे फेरीवाले वागत असतील आणि एका अधिकाऱ्यावर जिवघेणा हल्ला करत असतील. तर त्यांना भीती वाटली पाहिजे. ज्यांना शासनाची भीती वाटत नाही त्यांना राज ठाकरे साहेबांची नक्की भीती वाटली पाहिजे. झालेल्या घटनेवर सरकारने कठोर कारवाई करण्याची गरज आहे. नाहीतर आम्ही कठोर होणारचं आहोत.”
गेल्याकाही दिवसांपासून ठाणे महापालिकेने रस्ते अडविणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार, महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या पथकामार्फत सोमवारी कारवाई सुरू होती. सायंकाळी ६.३० च्या सुमारास पिंपळे यांच्या पथकाने कासारवडवली येथील बाजारपेठेत भाजीविक्रेता अमरजीत यादव याची गाडी जप्त केली. त्यामुळे अमजीत याने पिंपळे यांच्या पाठीमागून येऊन त्यांच्या डोक्यावर सुऱ्याने वार करण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला वाचविण्यासाठी पिंपळे यांनी सुरा पकडला. मात्र, त्यावेळी त्यांच्या डाव्या हाताची तीन बोटे कापली गेली. पिंपळे यांच्या बचावासाठी गेलेल्या त्यांच्या अंगरक्षकावरही अमरजीतने हल्ला केला. यात त्याच्याही डाव्या हाताचे बोट कापले गेले.
घटनेनंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने अत्यंत शिताफीने अमरजीतला ताब्यात घेतले. त्यानंतर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात अमरजीत विरोधात तक्रार नोंदविली. या तक्रारीच्या आधारे, त्याच्याविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
साहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या एका बोटाची शस्त्रक्रिया मंगळवारी पहाटे ज्युपिटर रुग्णालयात करण्यात आली. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सहाय्यक आयुक्तांची राजकीय नेत्यांनी भेट घेतली. आता बरं होताच पुन्हा एकदा अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई करणार असे सहायक आयुक्त कल्पिता पिंगळे यांनी सांगितले आहे.