मुंबई : देशात करोनाच्या लाटेने देवालाही लॉक केले आहे. मात्र नवरात्रीच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरांचे दरवाजे उघडणार आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे. असे असले तरी दुसरीकडे नाशिकची ग्रामदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कालिका देवी मंदिर प्रशासनाने घेतलेल्या अजब निर्णयाची सर्वत्र जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
कालिका देवी मंदिर प्रशासनाच्या निर्णयानुसार आता देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना टोकन घेणं आवश्यक करण्यात आलं आहे. मात्र, या टोकनसाठी १०० रुपये भरावे लागणार आहेत. ही व्यवस्था करण्यासाठी देण्यात आलेले कारण देखील वेगेळेच आहे. कालिका देवी मंदिर ट्रस्टच्या या अजब निर्णयामुळे भाविक देखील बुचकळ्यात पडले आहेत. मंदिर ट्रस्टच्या निर्णयानुसार, आता कालिका देवी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडे त्यासाठीचं टोकन असणं आवश्यक असणार आहे.
हे टोकन भाविकांना ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे. यासाठी विशिष्ट सॉफ्टवेअर देखील मंदिराकडून तयार करण्यात आले आहे. १०० रुपये भरल्यानंतरच हे टोकन भाविकांना मिळणार आहे. त्यामुळे सर्वत्रच या निर्णयाविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, यासंदर्भात कालिका देवी मंदिर ट्रस्टचे मात्र वेगळे म्हणणे आहे. “कोविडमुळे पोलीस प्रशासनाशी चर्चा करून शासनाच्या नियमाधीन राहून आमच्या पद्धतीने आम्ही टोकन पद्धती आणली आहे. टोकनसाठीच्या सॉफ्टवेअर वगैरेसाठी खर्च आहे. भाविकांसाठी सेक्युरिटी गार्ड नेमणं, साफसफाई करणं, फवारणी करणं या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू”, अशी प्रतिक्रिया कालिका मंदिर संस्थानचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील यांनी दिली आहे. २४ तास मंदिर खुलं राहील. एका तासात ६० भाविकांना मंदिरात प्रवेश करता येईल. त्याशिवाय, प्रसाद, फुलं, नारळ हे काहीही देवीला अर्पण करता येणार नाही, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, याआधी देखील मंदिर ट्रस्टनं सशुल्क दर्शन पद्धती आणली होती. २०१८ मध्ये देखील अशाच प्रकारे दर्शनासाठी शुल्क आकारण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर त्याला स्थानिकांनी विरोध दर्शवला होता. मात्र, तरी देखील विश्वस्त मंडळ आपल्या निर्णयावर ठाम राहिलं होतं.