नवी दिल्ली – देशात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा हाताबाहेर जात असल्याच्या पार्श्वभूमीवर परदेशातून विमानमार्गे येणारी वाहतूक थांबवावी अशी मागणी करण्यात आली आहे. भारतात करोनाचा शिरकाव याच मार्गाने झाला होता व नंतर पाहता पाहता प्रकरण हाताबाहेर गेले होते. त्या पार्श्वभूमीवर आता विमानसेवा रोखण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
देशात सध्या करोना रुग्णांच्या वाढीमुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. काल दिवसभरात देशात 60 हजारापेक्षा जास्त करोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे आता करोनावर नियंत्रण आणणे प्रशासनाच्या दृष्टीने मोठे आव्हान ठरले आहे.
भारतात ब्रिटन आणि आफ्रिकन स्ट्रेनचे रुग्ण आढळत असल्याचे सर्वेक्षणात दिसून येत आहे. त्यामुळे परदेशातून येणारी उड्डाणे थांबवा अशी मागणी होऊ लागली आहे. दुसरी लाट थांबवण्यासाठी वंदे भारत मिशन अंतर्गत गेल्या वर्षीपासून परदेशात असलेल्या भारतीयांना परत मायदेशी आणले जात आहे.