मुंबई – देशात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र महाराष्ट्रात ही वाढ अधिक असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. मात्र सत्ताधारी महाविकास आघाडीतच लॉकडाऊनवरून एकमत नसल्याचे समोर आलं आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. मात्र विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं लॉकडाऊनला विरोध केला आहे. त्यात आता सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनंही लॉकडाऊन हा पर्याय होऊ शकत नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरेंची कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक म्हणाले की, “राज्यात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत हे सत्य आहे. पण लॉकडाऊन हा अंतिम पर्याय होऊ शकत नाही. तसा आग्रह आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केला आहे. दरम्यान “लॉकडाऊन राज्याला अजिबात परवडणारा नाही. तो जनतेलाही परवडणारा नाही. त्यामुळे तो अंतिम पर्याय होऊ शकत नाही. त्याऐवजी आरोग्य सुविधा वाढविण्यावर आणखी भर देण्यात यावा अशी राष्ट्रवादीची भूमिका असल्याचं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं.