पिंपरी – गेल्या काही दिवसांपासून तापमानात होत असलेल्या बदलामुळे उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. सध्याचा धरणातील पाणीसाठा पाहता येत्या उन्हाळ्यात पाण्याचा अधिक तुटवडा जाणविणार नाही. गेल्या वर्षी पावसाळ्याला उशिरा सुरुवात झाली होती आणि मॉन्सूनने परतण्यास देखील उशीर केला. यामुळे सध्या पवना धरणात यंदा मुबलक साठा असून हे पाणी जुलै-ऑगस्टपर्यंत पुरेल, अशी शक्यता आहे.
शनिवारी (दि. 11) 60.55 टक्के अर्थात 6.3 टीएमसी एवढा पाणी साठा शिल्लक असून गतवर्षीही 61.12 टक्के पाणी साठा शिल्लक होता. आंद्रा धरणातून 100 एमएलडी पाणी उचलण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पाण्यासाठी यंदा वणवण थांबण्याची शक्यता आहे.
पिंपरी चिंचवड शहराला दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. महापालिका पवना धरणातून रोज 510 एमएलडी तर एमआयडीसीकडून 30 एमएलडी पाणी उचलते. वातावरणातील बदलामुळे दरवर्षी उन्हाळ्यात शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणतील पाणी साठ्यात घट होताना दिसत आहे. परिणामी उन्हाळ्यात पाणी कपातीचा सामना करावा लागतो. मात्र, यंदाचा उन्हाळा शहरवासीयांसाठी सुकर ठरणार आहे. पवना धरणात यंदा गतवर्षीएवढाच पाणीसाठा आहे. तसेच आंद्रा धरणातून 100 एमएलडी पाणी उचलण्याचे नियोजन आहे. शनिवारी घेतलेल्या आकड्यांनुसार पवना धरणात मागील वर्षी 61.12 तर, यंदा 60.55 टक्के पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे या वर्षी जास्त पाणी टंचाई भासणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
100 एमएलडी पाणी उचलण्याचे नियोजन
शहराला 25 नोव्हेंबर 2019 पासून एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. महापालिका सध्या मावळातील पवना धरणातून दिवसाला 510 एमएलडी पाणी उचलत आहे. दिवसाआड पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पहिल्या टप्प्यात आंद्रा धरणातून 100 एमएलडी पाणी उचलण्याचे नियोजन आहे. त्याकरिता निघोजे बंधारा येथे अशुद्ध जलपसा केंद्र उभारले आहे. त्यासह चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्राचे कामही पूर्ण झाले आहे. त्यामुळे तेही पाणी उपलब्ध होणार असून शहरवासियांना त्याचाही दिलासा मिळेल. इतर धरणातून उचलले जाणारे अतिरिक्त पाणी आणि पवना धरणातील जलसाठा पाहता यावर्षीचा उन्हाळा पाण्याच्या दृष्टीने सुसह्य ठरणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.