राजगुरूनगर (रामचंद्र सोनवणे) : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. खेडजवळ अज्ञात भरधाव कारने रास्ता ओलांडणाऱ्या १७ महिलांना धडक दिली आहे. या धडकेत पाच महिलांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर, तीन महिलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सोमवारी रात्री ११ च्या सुमारास हा अपघात झाला आहे. याप्रकरणी खेड पोलीस अज्ञात कारचा शोध घेत आहेत.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर राजगुरुनगर जवळच्या शिरोली, (ता. खेड) परिसरात खरपुडी फाट्यावर सोमवारी (दि.१३) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास चार चाकी गाडीने महामार्ग ओलांडणाऱ्या १७ महिलांना धडक दिली. या अपघातात ५ महिलांचा मृत्यू झाला आहे तर तीन अत्यवस्थ आहेत. उरवरीत ९ महीला सुखरूप आहेत.
याबाबत खेड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरोली ता खेड येथे खरपुडी फाट्यावर कृष्णपिंगाक्ष कार्यालयात आज मंगळवारी (दि.१४) लग्न आहे. या लग्नात पुण्यातील स्वारगेट, खडकवासला, किरकटवाडी, रामटेकडी परीसरातून स्वयंपाक करून वाढपी काम करण्यासाठी ( केटरिंग) या महिला आल्या होत्या. पुण्याकडून येणाऱ्या बसमधून खरपुडी फाटा येथे या सर्वजणी खाली उतरल्या. पश्चिम बाजूकडून पूर्वेकडे रस्ता क्रॉस करताना त्या घोळक्याने जात होत्या.
दरम्यान पुणेकडून वेगाने येत आलेल्या चारचाकी वाहनाने या सर्वांना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भयंकर होता की, २ महिलांचा जाग्यावरच मृत्यू झाला तर ३ महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात सुनंदा सटवा गजेशी रा. अप्पर सुपर पाण्याची टाकी, मुशिला वामन देते रा. रामटेकडी शांतीनगर, अदुबाई कोंडीबा कांबळे रा. किरकटवाडी सिंहगड रोड पुणे, यराबाई प्रभु वाघमारे रामटेकडी सर्वे नं.110 प्रमथा हौसींग इमारत क्रमांक डी रामटेकडी हडपसर पुणे व अन्य एक महिला अशा पाच महिलांचा अपघातात मृत्यू झाला आहे. शोभा राहुल गायकवाड, सारीका देशकर, वैशाली लक्ष्मण धोत्रे , शेभा सुभाश शिंदे या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत.
भीषण अपघात अपघात झाल्याने जखमी झालेल्या महिलांचा अंधारात आरडा ओरडा झाला. रस्त्यावर रक्ताची थारोळी साचली. नेमके याच वेळी पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले येथूनच निघालेले होते. त्यांनी पोलीस व प्रशासकीय यंत्रणाशी तातडीने संपर्क करुन जखमी महिलांना स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात दाखल केले. चांडोली ग्रामीण रुग्णालयासह राजगुरूनगर परिसरातील चार ते पाच खासगी रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अपघात मदत कार्यात पोलीस उपनिरिक्षक भारत भोसले, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राऊत, पोलिस शिपाई सुनील बांडे, सचिन गिलबिले,सोमनाथ गव्हाणे, रमेश दाते, रामदास बोऱ्हाडे,श्री कोरके, विशाल कोठावळे, प्रवीण गेंगजे, योगेश भंडारे,शेखर भोईर यांच्यासह चार होमगार्ड यांच्यासह ग्रामस्थानी मदत कार्य केले.
पोलिस उपनिरीक्षक भारत भोसले यांनी सांगितले, महामार्ग रस्ता ओलांडत असताना चार चाकी गाडीने या महिलांना चिरडले. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलो. तेथील परिस्थिती भयानक होती. महिला असल्याने मृतदेह व जखमींना उचलण्यासाठी अडचणी ल्या स्थानिक नागरीक व महिला पोलिसांच्या मदतीने जखमींना तात्काळ रुग्णालयात पाठविण्यात आले घटनास्थळी २ तर उपचारा दरम्यान तीन अशा पाच महिलांचा जाग्यावर मृत्यू झाला आहे. अपघातातील अन्य ३ महिला गंभीर आहेत. उर्वरित महिला सुखरूप आहेत.
दरम्यान या अपघाताबाबत शिवानी कैलास माने, वय 24 धंदा ठेकेदार रा. पर्वती दर्शन साईबाबा मंदीरासमोर प्लॉट नंबर ३९ सातारा रोड स्वारगेट पुणे यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पांढरे रंगाची महिंद्रा एक्सयुही किंवा टियुव्ही या मॉडेलची कारच्या चालकांविरोधात खेड पोलीस ठाण्यात भा द वि कलम 304 (अ), 304(2); 279, 337, 338 मोटार वाहन का. कलम 184,134 (ब)गुन्हा दाखल झालं आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट करीत आहेत.
पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर उतारावर शिरोली गावाच्या हद्दीत खरपुडी फाट्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. या बाजूकडे मंगलकार्यालये असल्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते त्यामुळे रस्ता ओलांडताना अपघात होत आहेत.राष्ट्रीय महामार्ग असल्याने व तीव्र उत्तर असल्याने मोठे अपघात झाले आहे. ते रोखण्यासाठी महामार्गावर गतिरोधक व सर्व्हिस रस्ता होणे गरजेचे आहे. अशी मागणी स्थनिक ग्रामस्थांनी केली आहे.