बेलसर (वार्ताहर) – पुरंदर तालुक्यात सध्या अतितीव्र दुष्काळ पडला आहे.त्यात पुरंदर उपसा सिंचन योजना देखभाल दुरुस्तीसाठी बंद आहे. मागील अनेक काळापासून पारगाव मेमाणे (ता. पुरंदर) येथील शेतकरी पाणी चोरीबाबत तक्रारी करीत आहेत.
त्यातच पारगाव येथील लाभार्थी शेतकरी पुरंदर उपसा सिंचन योजना मायनर 4 दिवे लाइन यावरील लाभक्षेत्राच्या बाहेर छुप्या पद्धतीने पाइपलाइन जोडून देण्याबाबत तक्रारी अर्ज उपसा सिंचन व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता महेश कानीटकर यांना दिले आहे.
पुरंदर उपसा सिंचन योजना दिवे लाइन मायनर 4 च्या लाभार्थी क्षेत्रातील शेतकर्यांव्यतिरीक्त एक शेतकरी आपल्या वैयक्तिक लाभासाठी लाभ क्षेत्राच्या बाहेर दुसर्या गावाला पाइपलाइन जोडून देत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. या जोडणीस पारगाव येथील शेतकर्यांनी तीव्र विरोध केला आहे.
प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घेता लाभक्षेत्रातच पाणी कमी पडत आहे व त्यामुळे पिके वाळुन चाललेली आहेत. व लाखो रुपयांचे नुकासान होत आहे. असे असताना लाभक्षेत्राच्या बाहेर पाणी देणे कितपत योग्य आहे आणि असे पाणी देण्यास उपसा सिंचन विभागाची परवानगी असल्यास भविष्यात आम्हाला अधीही पाणी कमी पडू दिले जाणार नाही, असे लेखी द्यावे.
मायनर 4 वरून कुठेही जोडून देण्यास आमची हरकर नाही. तसेच संबंधित व्यक्तीची लाइन मायनर चार लाइनपासून उंचावर आहे. त्यामुळे लहान आउटलेट काढल्याने 4 नंबर मायनर लाइन मागे दाब आल्यामुळे वारंवार फुटत आहे.
त्यामुळे देखील त्यास लाइनला पुढे लाइन जोडून देण्यास विरोध आहे याची दखल घेवून कारवाई करावी, अशी मागणी चंद्रशेखर मेमाणे, प्रवीण मेमाणे, विजय मेमाणे, पांडुरंग मेमाणे, संजय मेमाणे, प्रकाश मेमाणे, पप्पु निंबाळकर, विकास मेमाणे व इतर शेतकर्यांनी केली आहे.
सासवड विभागातील अधिकारी दाद देत नसल्याने आम्ही थेट उपसा सिंचन विभाग पुणे या ठिकाणी जाऊन कार्यकारी अभियंता कानेटकर यांना अनधिकृत जोडणी व पाणीचोरी बाबत निवेदन दिले. गेले 7 ते8 महिने आम्ही सतत लाभक्षेत्राच्या बाहेर छुपी जोडणी व पाणीचोरी याबाबत तक्रार करत असून सिंचन विभागाकडून कुठलीही कार्यवाही केली जात नाही. आता कार्यवाही न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. – विकास मेमाणे, लाभार्थी शेतकरी, पारगाव मेमाणे