वाल्हे, (वार्ताहर) – वाल्हे (ता. पुरंदर) परिसरात मागील चार-पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून मंगळवारी (दि. 27) सायंकाळच्या दरम्यान अवकाळी पावसाचे ठीपके वाल्हे व परिसरात पडले. तर, नीरा परिसरात अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.
यावर्षी तीव्र पाणीटंचाईचा सामना करीत शेतकरीवर्गाने रब्बी हंगामातील काही पिके मोठ्या संकटांचा सामना करीत, जगविली आहेत. मात्र, अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या तर हातातोंडाशी आलेल्या पिकांचे अधिकचे नुकसान टाळण्यासाठी काढणीला आलेल्या गहू, हरभरा, ज्वारी पिकांची काढणीस वेग आला आहे.
पुरंदर तालुक्यातील काही गावांतही थोड्या प्रमाणात अवकाळीच्या सरी पडल्या असून मागील आठवड्यापासून सकाळ पासूनच कडाक्याचे ऊन पडत असून दुपारी दोन नंतर आकाशात दाट ढग दाटून येत आहेत. यामुळे शेतकर्यांच्या जीवाची घालमेल होत आहे.
सध्या अनेक भागात कधी ऊन, तर कधी ढगाळ हवामान, तर पहाटे थंडी यामुळे गहू, कांदा, मका पिकांना फटका बसत आहे. तसेच भाजीपाला पिकांवरही रोग, किडीचा प्रादुर्भावाची शक्यता निर्णाम झाली आहे.
ढगाळ हवामानामुळे जोमात आलेल्या पिकांवर रोग, किडींनी आक्रमण केले आहे. सततच्या बदलत्या हवामानामुळे पिकांवर रोग किडीचा प्रादुर्भाव वाढत असून फवारणीच्या खर्चात वाढ होऊ लागली आहे. यामुळे शेतकरीवर्ग आर्थिक संकटात सापडत आहेत.