नगर -राज्यातील 70 टक्क्यांहून अधिक शिक्षकांनी गेली दोन महिने कोविड ड्यूटी केली आहे. यात काही शिक्षकांना आपला प्राणही गमवावा लागला आहे. उपासमारीमुळे विनाअनुदानित शिक्षकांच्या आत्महत्यांचे प्रमाणही याच काळात वाढलं आहे.
यासर्व बाबींची तातडीने दखल घ्यावी, या मागणीचे निवेदन शिक्षक भारतीचे शिक्षक आमदार कपिल पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांनी मुख्यमंत्र्याना निवेदन दिले अशी, माहिती शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनिल गाडगे यांनी दिली.
कोविड ड्युटीवर असताना मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकांच्या कुटूंबियांना शासन निर्णयानुसार नुकसान भरपाई देण्यात यावी. त्या कुटुंबातील एका सदस्याला अनुकंपा तत्त्वावर तात्काळ नोकरीत सामावून घ्यावे.
उपासमारीमुळे ज्या विनाअनुदानित शिक्षकांनी आपलं जीवन संपवलं आहे त्यांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत द्यावी. त्या कुटुंबातील एका सदस्याला अनुकंपा तत्त्वावर तात्काळ नोकरीत सामावून घ्यावे. ताबडतोबीने घोषित, अघोषित सर्वच विनाअनुदानित शाळा, कॉलेज यांना प्रचलित धोरणानुसार अनुदान वितरित करावे., अशी मागणी शिक्षक नेते सुनिल गाडगे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप यांनी केली आहे.