कॉंग्रेसला मिळणार उभारी?
देशातील राजकीयदृष्ट्या सर्वांत महत्वाचे राज्य असणाऱ्या उत्तरप्रदेशच्या सत्तेपासून कॉंग्रेस तीन दशकांपेक्षा अधिक काळपासून दूर आहे. त्यामुळे त्या राज्यात कॉंग्रेस पक्ष संघटना दुबळी बनली आहे. मात्र, यावेळची निवडणूक उभारी देणारी ठरेल असा विश्वास कॉंग्रेसला वाटत आहे. व्यापक करिष्मा असणारे थोडे नेते देशात आहेत. त्यापैकी एक मानल्या जाणाऱ्या कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी पक्षाच्या उत्तरप्रदेश शाखेची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने यावेळी उत्तरप्रदेश निवडणुकीत वेगळ्या रणनीतीवर भर दिला.
कॉंग्रेसने निवडणुकीत महिला कार्ड चालवले आहे. अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा शब्द पक्षाने वास्तवात उतरवला. तसेच, नव्या चेहऱ्यांना उमेदवारीत झुकते माप दिले. प्रदीर्घ कालावधीनंतर कॉंग्रेस उत्तरप्रदेशातील विधानसभेच्या एकूण 403 पैकी 400 जागा लढवत आहे. त्याचा लाभ पक्ष संघटनेच्या विस्तारासाठी होईल, असे कॉंग्रेसला वाटते.
उत्तरप्रदेशात प्रमुख लढत भाजप आणि समाजवादी पक्षातच असल्याचे मानले जात आहे. तसे असले तरी प्रियंका यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे कॉंग्रेसने लक्ष वेधल्याचे चित्र आहे. उत्तरप्रदेशात कॉंग्रेस लक्षवेधी कामगिरी करणार का ते निकालातून पुढे येईलच.
पहिल्या तीन पक्षांत आप?
देशातील आठ राजकीय पक्षांना राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा प्राप्त आहे. त्यातील भाजप आणि कॉंग्रेस वगळता इतर पक्षांची अनेक राज्यांतील ताकद नगण्य स्वरूपाचीच आहे. त्यापार्श्वभूमीवर, भाजप आणि कॉंग्रेसला पर्याय ठरण्याचा चंग आम आदमी पक्षाने (आप) बांधला आहे. सध्या आपला प्रादेशिक पक्षाचा दर्जा आहे. मात्र, आताच्या विधानसभा निवडणुकांनी भाजप, कॉंग्रेसपाठोपाठ देशातील तिसरा महत्वाचा पक्ष बनण्याची संधी आपला मिळवून दिली आहे.
आपची स्थापना 2012 मध्ये झाली. त्या पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकांत जोरदार मुसंडी मारून सत्ता काबीज केली. पंजाबमध्ये मागील निवडणुकीत (2017) आपने कॉंग्रेसपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळवल्या. त्यामुळे त्या राज्याच्या विधानसभेतील तो प्रमुख विरोधी पक्ष ठरला. यावेळी पंजाबच्या निवडणुकीत आपकडे सत्तेचा दावेदार म्हणून पाहिले जात आहे.
पक्ष विस्ताराच्या दृष्टीने आपने उत्तरप्रदेश, गोवा आणि उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकाही ताकदीने लढवल्या आहेत. त्या राज्यांत आपची कशी कामगिरी करणार याविषयी उत्सुकता आहे. वेगळ्या स्टाईलचे, विकासाभिमुख आणि जनहिताला महत्व देणारे राजकारण आपचा प्रभाव वाढवत असल्याचे चित्र आहे.
करिष्मा टिकवण्याचे आव्हान
भाजपने 2017 मधील विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून उत्तरप्रदेशची सत्ता काबीज केली. त्या राज्याच्या मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ विराजमान झाले. भाजपचे यश आणि नेतृत्वाची धुरा आदींमुळे योगींचा राजकीय प्रभाव वाढला. देशभरातील निवडणुकांत ते भाजपचे स्टार प्रचारक ठरले. मात्र, यावेळी उत्तरप्रदेशची सत्ता राखणे भाजपसाठी सोपे नसल्याचे बोलले जाते.
साहजिकच, राजकीय करिष्मा टिकवण्याचे आव्हान योगींपुढे उभे आहे. योगी सरकारने उल्लेखनीय कार्य केल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. त्याउलट, योगी सरकारने उत्तरप्रदेशला आणखी मागे नेल्याचा प्रतिदावा विरोधक करत आहेत. उत्तरप्रदेशात लोकसभेच्या सर्वांधिक 80 जागा आहेत. त्यामुळे केंद्राची सत्ता मिळवण्याचा मार्ग उत्तरप्रदेशातून जातो, असे म्हटले जाते.
त्या राज्यात सलग दोन लोकसभा निवडणुकांत भाजपने जोरदार कामगिरी केली. त्यामुळे केंद्रात सरकार स्थापण्याचा भाजपचा मार्ग सुकर झाला. आता लोकसभेची पुढील निवडणूक दोन वर्षांनी होईल. त्यामुळे यावेळच्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालाला मोठे महत्व आहे. त्या निकालाचा परिणाम पुढील लोकसभा निवडणुकीवर होऊ शकतो. साहजिकच, केंद्र सरकारचे नेतृत्व करणाऱ्या भाजपचे बरेचसे भवितव्य उत्तरप्रदेशवर आणि योगींच्या करिष्म्यावर अवलंबून आहे.