माधव विद्वांस
मान ताठ अन् तिरपी टोपी अशा तडफदार व्यक्तिमत्त्वाचे, शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक शंकरराव मोरे यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म पुणे येथे 14 ऑगस्ट 1899 रोजी एका गरीब कुटुंबात झाला.लहानपणीच त्यांचे मातृपितृ छत्र हरपले. अशा अडचणीतही त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण पार पडले. फर्गसन महाविद्यालयातून बी.ए तसेच मुंबई आणि पुण्यातील लॉ कॉलेजमधून कायद्याचा अभ्यास पूर्ण केला. काही काळ त्यांनी वकिलीही केली.
सत्यशोधक समाज तसेच साम्यवादी विचारसरणीच्या मुशीतच त्यांना वैचारिक प्रगल्भता आली. स्वतः गरिबीत वाढल्यामुळे साहजिकच ते समाजसेवेकडे वळले. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. त्यांचा स्वतःचा मोठा ग्रंथसंग्रह होता. त्यांचे घर कार्यकर्त्यांनी गजबजलेले असायचे. त्यांच्या पत्नी शांताबाईं स्वतः जातीने सगळ्यांची ऊठबस करायच्या. परिवर्तनवादी चळवळींमध्ये स्वतःचे असे खास स्थान निर्माण केले होते. वर्ष 1946-1948 या कालावधीत ते अखिल भारतीय कॉंग्रेस समिती सदस्यही होते. पुढे शंकरराव मोरे व त्यांचे सहकारी शेतकरी कामगार पक्षाच्या निर्मितीकडे वळले. वर्ष 1946च्या सप्टेंबर महिन्यात सहकाऱ्यांना शंकरराव मोरे यांनी शेतकरी कामगार पक्षाची आवश्यकता असल्याचे सांगितले.
11 जानेवारी 1947 रोजी मुंबईतील शंकरराव मोरे यांच्या घरी कॉंग्रेस शेतकरी-कामकरी संघाची बैठक बोलावण्यात आली होती. पुण्यात भाऊसाहेब शिरोळे यांच्या घरी केशवराव जेधे, औटे, मोहिते, आनंदराव चव्हाण, तुळशीदास जाधव, दत्ता देशमुख, भापकर, भाऊसाहेब शिरोळे यांना एकत्रित करून शंकरराव मोरे यांनी “शेतकरी-कामकरी’ ऐवजी नवा “शेतकरी-कामगार पक्ष’ स्थापन करण्याचा नारळ फोडला. 13 जून 1948 रोजी पक्षाची स्थापना करण्यात आली. पहिल्याच लोकसभा निवडणुकीत ते सोलापूरमधून निवडून आले व केंद्रीय अर्थ समितीचे सदस्यही झाले. त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणा घडवण्यासाठी सतत पुढाकार घेतला. उपेक्षितांची सामाजिक आणि आर्थिक उन्नती होण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले.
या कार्याच्या अनुषंगाने त्यांनी अनेक संस्थांमधून विविध पदांवर काम केले. पुणे जिल्हा शालेय शिक्षण मंडळ सदस्य (1931-1935),मुंबई विद्यापीठाचे अधिछात्र (सिनियर फेलो)(1933-1938), पुणे जिल्हा स्थानिक समिती अध्यक्ष (जिल्हा लोकल बोर्ड) (1935-40), पुणे जिल्हा ग्रामीण विकास मंडळाचे अध्यक्ष (1938-1940), अखिल भारतीय कॉंग्रेस समिती सदस्य (1946-1948), महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समिती सदस्य (1946-1948), प्राथमिक शिक्षक प्रशिक्षण समिती, मुंबईचे अध्यक्ष (1937), मुंबई स्थानिक चौकशी समिती सदस्य (1939), न्यायांगाचे शासनांगापासून विलगीकरण समिती सदस्य, मुंबई (1947), इंडियन रिफायनरी लि. चे संचालक, पहिल्या लोकसभेचे सदस्य (1952-57), पहिल्या लोकसभेतील अंदाज समितीचे सदस्य अशी विविध पदे त्यांनी भूषविली. 5 मार्च 1966 रोजी त्यांचे निधन झाले.