मुंबई – महाराष्ट्राच्या गृह विभागाने कोविड कालावधीत लॉकडाऊन उल्लंघनाशी संबंधित प्रकरणांमध्ये नोंदवलेले सर्व खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. गृहखात्याने हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात प्रस्ताव या आठवड्यात मंत्रिमंडळात मांडला जाणार असून, त्याला मंजुरी मिळताच खटले तातडीने मागे घेण्यास सुरुवात केली जाईल, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे. खटले दाखल झालेल्यांमध्ये राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचासुद्धा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भातील महत्त्वाची घोषणा केली आहे. करोना कालावधीमध्ये कलम 188 अंतर्गत दाखल करण्यात आलेले गुन्हे गृह विभाग मागे घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. करोनामुळे राज्यात अनेक निर्बंध लावण्यात आले होते. त्यादरम्यान लॉकडाऊनमध्ये राज्यातील अनेक नागरिक व विद्यार्थ्यांवर कलम 188 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या गुन्ह्यांमुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अडथळे निर्माण होत आहेत. त्याचा विचार करता राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
दिलीप वळसे पाटील म्हणाले की, करोना काळात संचारबंदी लागू करण्यात आली होती. यावेळी काही नागरीकांवर तसेच विद्यार्थ्यांवर कलम 188 अंतर्गत गुन्हे नोंद झाले आहेत. हे सर्व गुन्हे मागे घेण्याबाबत मंत्रिमंडळात हा प्रस्ताव मांडला जाईल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणामध्ये अडचणी येऊ नयेत म्हणून त्यांच्या भल्यासाठी हा निर्णय घेतला जाईल. त्यासंदर्भातील प्रक्रिया सुरु आहे, असे पाटील यांनी सांगितले आहे.