पुणे -पावसाने विश्रांती घेतल्याने खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा स्थिर आहे. सध्यस्थितीत खडकवासला प्रकल्पात 8.62 टीएमसी म्हणजे 29.58 टक्के इतका आहे. हा उपलब्ध पाणीसाठा शहराला सात महिने पुरेल इतका आहे.
यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन झाले. पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ओढे-नाल्यांमार्फत धरणांमध्ये पाणी जमा होऊ लागले. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली नाही.
सध्यस्थितीत खडकवासला धरणात 0.66 टीएमसी म्हणजे 33.21 टक्के, पानशेत धरणामध्ये 4.11 टीएमसी, वरसगावमध्ये 3.23 टीएमसी आणि टेमघरमध्ये 0.62 टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.
पानशेत धरणातून पॉवरहाऊसमधून 590 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. तर खडकवासला धरणातील कालव्यातून 100 क्युसेक पाणी सोडले जात आहे.
मागील वर्षी याच दिवशी खडकवासला प्रकल्पात 8.13 टीएमसी म्हणजे 27.90 टक्के पाणीसाठा होता.