मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी काल शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी चप्पलफेक करत आंदोलन केले. हा सगळा प्रकार तासभर चालला. दरम्यान, या प्रकरणावर सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी या सगळ्या प्रकारावर संशय व्यक्त केला आहे.
या घडलेल्या प्रकरणावर बोलताना अजित पवार यांनी,“चिथावणीखोर भाषा कुणी वापरली? कुणी त्यांच्या भावना भडकवल्या? नको त्या गोष्टी त्यांच्या डोक्यात घातल्या. हे लोक असा विचार करणारे नाहीत. पण कुणीतरी शक्ती त्यांच्या पाठिशी होती. ते शोधून काढण्याचं काम पोलीस विभागाचं आहे. दिलीप वळसे पाटील यांचं म्हणणं आहे की त्यांनी देखील अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. लवकरच कुणी हे केलं याचा छडा लागेल”, असे त्यांनी म्हटले आहे.
तसेच या प्रकरणावर संशय व्यक्त करताना त्यांनी म्हटले कि, “आधी जल्लोष करणाऱ्या आंदोलक कर्मचाऱ्यांनी नंतर सिल्व्हर ओकवर का धाव घेतली? तसेच “मला एका गोष्टीची गंमत वाटते. उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर तिथे गुलाल उधळला गेला. तिथे मिठाई वाटली गेली. खूप मोठं यश मिळवलं असं दाखवलं गेलं. मग एवढं सगळं होत असताना पुन्हा सिल्व्हर ओकवर जाण्याचं काहीच कारण नव्हतं. त्याच्या पाठिमागचं कारण काय? त्यातल्या एकानं म्हटलंय की १२ तारखेला बारामतीला जाणार”, असे अजित पवार म्हणाले.
दरम्यान, या सर्व प्रकरणात पोलीस यंत्रणावर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. याविषयी बोलताना,“माझं स्पष्ट मत आहे की पोलीस यंत्रणेचं वेगवेगळी माहिती मिळवण्याचं काम असतं. पण ते लोक कमी पडले हे निर्विवाद सत्य आहे. कारण आंदोलक आले, तिथे मीडियाचे देखील कॅमेरे आहेत. जे घडतं, ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मीडियाचं आहे. पण जर हे मीडियानं शोधून काढलं, तर मग पोलीस विभागाच्या संबंधित यंत्रणेला का नाही शोधता आलं? त्याहीबाबत एका वरीष्ठ अधिकाऱ्याला चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यातून वस्तुस्थिती पुढे येईल”, असे अजित पवार यावेळी म्हणाले.