मुंबई – महाराष्ट्रात एसटीच्या बसेस आज सकाळपासून पूर्ण आसन क्षमतेने धावू लागल्या आहेत. आतापर्यंत करोना निर्बंधांमुळे प्रत्येक एसटी बसेसमध्ये केवळ 50 टक्केच प्रवासी घेण्याची मूभा होती. पण आता मात्र शंभर टक्के आसन क्षमतेने या बसेस चालवण्यात येत आहेत. त्यामुळे राज्यातील नागरिकांची चांगली सोय होणार आहे.
ग्रामीण तसेच शहरी भागातील लोकांची एसटी सेवा बंद असल्याने आणि ती केवळ मर्यादित स्वरूपातच सुरू असल्याने अनेकांची मोठीच कुचंबणा होत होती. मुंबई प्रादेशिक विभागातील नागरिकानाही यामुळे मोठाच दिलासा मिळणार आहे, कारण तेथे अजून लोकल सेवा पूर्ण स्वरूपात सुरू नसल्याने प्रवाशांना वाहनांचा पर्याय उपलब्ध नव्हता.
सध्या बसेसमध्ये एका सीटवर एकच प्रवासी बसण्याची अनुमती दिली गेली होती. या अपुऱ्या व्यवस्थेमुळे एसटीलाही तोट्यातच गाड्या चालवाव्या लागत होत्या.
सध्या एसटी महामंडळातर्फे राज्यभरात पाच हजार बसेस चालवल्या जात असून त्यातून सुमार साडेपाच लाख लोकांची ये-जा केली जात आहे. महामंडळाकडे 18 हजार बसेसचा ताफा आहे.