मुंबई/पुणे – एस टी संप मिटवण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राज्याचे अर्थ मंत्री अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्यात सोमवारी तासभर चर्चा झाली. त्यानंतर संप लवकरच मिटेल, असे संकेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी दिले. त्यामुळे वातावरण निवळण्याचे आश्वासक चित्र निर्माण होत असतानाच परब यांच्या निवासस्थानावर एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली. त्यामुळे वातावरण पुन्हा चिघळले.
जनशक्ती संघटनेच्या चार ते पाच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. एस. टी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून एसटी कामगारांचा संप सुरू आहे. विलिनीकरणाच्या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी एक समितीही न्यायालयाच्या आदेशानुसार नेमण्यात आली आहे. मात्र तरी आंदोलनकर्ते कर्मचारी संपावर ठाम आहेत. अनेक कर्मचाऱ्यांचं निलंबनही करण्यात आले आहे, मात्र तरीही एसटी कर्मचारी मागे हटायला तयार नाहीत.
परब यांनी या संपाच्या मुद्द्यावर सोमवारी शरद पवार यांच्याशी चर्चा केली. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित होते. त्यामुळे या संपावर तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली होती.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवारांसोबत परबमबीर सिंह प्रकरणाची चर्चा करावी तितका तो गंभीर विषय नाही. इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी त्यांच्याकडे आणि आमच्याकडेही वेळ नाही. शरद पवारांसोबत अनेक विषयांवर चर्चा झाली. एसटीचा विषय हा तुम्हाला गंभीर वाटत असेल तर तो लवकरच सुटेल. शरद पवारांची एसटी संपाबाबत काही भूमिका आहे त्याबाबत त्यांनी अनिल परब आणि अजित पवारांसोबत चर्चा केली आहे. एसटी संपाबाबत पवार यांच्या बोलण्यातून असे वाटत आहे की काहीतरी तोडगा लवकरच निघेल, असे राऊत यांनी पत्रकारांना सांगितले.
महाराष्ट्रतले वातावरण कोण आणि का भडकवत आहे, या मागचा हेतू सर्वांना माहीत आहे. एसटी संपात तेल ओतण्याचे काम कोण करत आहे हे आम्हाला माहीत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाविषयी सर्वांना सहानुभूती आहे. जे करता येणे शक्य आहे ते सरकार करत आहे. शरद पवारांनी बैठकीत काही सकारात्मक सूचना दिल्या आहेत हे मला समजले, असे ते म्हणाले.