भोर – पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड तालुका करण्यात यावे, या मागणीचा ठराव पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला असल्याचे पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी सांगितले आहे.
या विषयांचे अनुषंगाने अधिक माहिती देताना रणजीत शिवतरे म्हणाले, छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी असा ज्याचा उल्लेख केला गेला आहे तो राजगड किल्ला वेल्हे तालुक्यात आहे. याच किल्ल्यावरून शिवरायांनी दोन दशकाहून अधिक काळ स्वराज्याचा कारभार आणि स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात आणले.
यामुळेच ज्या वेल्हे तालुक्यात हा किल्ला आहे त्या किल्ल्याचे नाव या तालुक्याला देण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. विशेषतः जुन्या दस्तवेजात म्हणजे आगदी शिवकाळापासून ते 1947 पर्यंत राजगड तालुका असाच उल्लेख या तालुक्याचा आढळतो. शासकीय मुद्रणालयाने 1939 मध्ये प्रकाशित केलेल्या पालखुर्द गावाचा नकाशात तालुका राजगड असाच उल्लेख आहे. या शिवाय इतिहास संशोधन मंडळाकडेही तालुका राजगड असा उल्लेख असलेला जुन दस्तावेज आढळून आला आहे.
या सर्व मुद्द्यांचा विचार करता वेल्हे तालुक्याचे राजगड असे नामांतर व्हायला हवे, अशी वेल्हे येथील स्थानिक रहिवाशांचीही मागणी असून, याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन वेल्हे तालुक्याचे नाव राजड करण्यात यावे, असा ठराव एकमताने मंजुर करण्यात आला आहे. या ठरावाच्या प्रती पुढील मंजुरीसाठी राज्य व केंद्र सरकारला पाठवल्या जाणार असल्याचे रणजीत शिवतरे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रकांत बाठे, भोर पंचायत समितीचे सभापती लहुनाना शेलार, रवींद्र बांदल व कार्यकर्ते उपस्थित होते.