मुंबई – गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत एसटी कृती समितीची बैठक सह्याद्री अतिथी गृहावर पार पडली. या चर्चेनंतर कृती समितीला आश्वस्त करण्यात आले.
सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत गंभीर आहे, आता एसटी कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर रुजू व्हावे, असे कळकळीचे आवाहन करण्यात आले आहे. एकूण 22 एसटी कामगार संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला हजर होते. यानतंर बोलताना एसटी कृती समितीचे सदस्य अजय गुजर म्हणाले, आमची चूक झाली, आता आम्ही वकील बदलत आहोत, गुणरत्न सदावर्ते यांची वकीली मागे घेतली असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच यापुढे अॅड सतीश पेंडसे हे आमच्याकडून लढतील असेही गुजर यांनी सांगितले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती कृती समितीने दिली. अजय गुजर म्हणाले की, आम्ही 20 डिसेंबरला संप मागे घेतला होता. कर्मचाऱ्यांच्या बहुतांश अडचणी सोडवलेल्या आहेत. लवकरच बैठक घेऊन सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगारावर चर्चा होणार आहे.
तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने भूमिका मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांची वकिली मागे घेतल्याचे सांगताना अजय गुजर म्हणाले की, आम्ही नवीन वकील नेमणार आहोत. कोर्टात हा लढा सुरू राहणार आहे. न्यायालय जो निर्णय विलिनीकरणाबाबत देईल, तो सरकार आणि एसटी कर्मचारी दोघांनाही मान्य राहिल, असे सांगण्यात आले.
एसटी पूर्वपदावर आणा सर्व मागण्या मान्य होतील, प्रवाशांना वेठीस धरून नका, अशी विनंती शरद पवार यांनी एसटी कामगारांना केली. तसेच कामावर रुजू झाल्यास कारवाईवर फेरविचार करण्यात येईल. जनतेला, एसटीला वेठीस धरून कोणताही फायदा होणार नाही, असे अनिल परब यांनी सांगितले.