पुणे – राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. एसटी कर्मचारी एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीवर गेल्या तीन ते चार महिन्यापासून ठाम आहेत. त्यामुळे राज्यातील एसटीची सेवा बंद आहे. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना 31 मार्चपर्यंत कामावर परतण्याचे आवाहन केले आहे. कर्मचारी कामावर हजर झाले नाही तर मग त्यांच्याबाबत कठोर भूमिका घेतली जाईल असा इशारा पवार यांनी यावेळी दिला आहे.
विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु आहेत, त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी 31 मार्चपर्यंत कामावर रुजू व्हा असे आवाहन पवार यांनी केले आहे. शिवाय एसटी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगा एवढा पगार मिळणार असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. मात्र गैरहजर राहणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही पवार यांनी कर्मचाऱ्यांना दिला आहे.
अजित पवार म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या जवळपास नेण्यात आले आहे. 1 ते 31 मार्चचा पगार 10 एप्रिलपर्यंत झाला नाही झाला तर त्याचीही जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे, आता संपकरी कर्मचाऱ्यांनी कोणाचंही न ऐकता कामावर रूजू व्हावे अशी विनंती त्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असून एसटी बसचा संप सुरू असल्याने या विद्यार्थ्यांना बराच त्रास सहन करावा लागतोय. दुर्गम भागातील लोकांना दळणवळणासाठी परवडणारी वाहने नसल्याने नागरिकांनाही त्रास सहन कारावा लागतोय. या सगळ्यांची अडचण ओळखून कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर कामावर रूजू व्हावे अशी विनंती पवार यांनी केली आहे.