खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील स्थिती
वाडा -खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील विद्यार्थी वाडा येथे शिक्षणासाठी येतात; मात्र विद्यार्थ्यांना ये-जाण्यासाठी वेळेवर एसटी बसची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यास जबाबदार कोण, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील वाडा हे गाव मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. येथे 1ली ते 12वी पर्यंत असे वर्ग सुरू आहेत. शाळेसाठी वाळद, आव्हाट, खरोशी, डेहणे, सुरकुंडी, माजगाव, साकुर्डी, कहू, कोयाळी, चास, वेताळे, गुंडाळवाडी, बुरसेवाडी या ठिकाणावरून मोठ्या संखेने विद्यार्थी येतात.
राजगुरूनगर येथून दुपारी 2. 45 ला सटणारी बस वाडा येथे दुपारी 3.30 वाजता येते. या बसने डेहणे, खरोशी, आव्हाट, वाळद, येथील विद्यार्थी ये-जा करतात. पण शाळा सुटण्याची वेळ 4.45 आहे. मात्र, विद्यार्थ्यांना यानंतर बस नसल्याने नाईलाजाने शाळा सव्वातास अधी म्हणजे 3.30ला सोडावी लागत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
दराकवाडी, गुंडाळवाडी, बुरसेवाडी, कडधे येथील विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी भोरगिरी ते राजगुरूनगर बस वाडा येथे सायंकाळी 5.30 ला येते.
त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्धा ते पाऊण तास बसची प्रतिक्षा करावी लागते; परंतु बसमध्ये बसण्यासाठी विद्यार्थ्यांना जागा मिळत नाही, त्यामुळे काही विद्यार्थी दुसऱ्या बसची वाट बघतात. तर दुसरी राजगुरूनगर ते वाडा ही बस वाडा येथे 6 वा; त्यामुळे विद्यार्थ्यांना जवळपास एक ते दीड तास तिष्ठत थांबावे लागते.
या गावांना बसची सुविधाच नाही
सुरकुंडी, माजगाव, साकुडी, चिखलगांव या नदीपलीकडील गावांवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना बसची सुविधाच नसल्याने त्यांना शाळेत येण्यास उशीर होतो. तर त्यांना जाण्यासाठी वाळद येथून 9 ते 10 किलोमीटर पायी प्रवास करावा लागर असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे वाडा ते भीमाशंकर अशी मिनी बस सुरू केल्यास विद्यार्थ्यांचे हालअपेष्टा थांबतील, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.