-माधव विद्वांस
महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे निर्माते तसेच समाजशास्त्रज्ञ, इतिहासतज्ज्ञ, कादंबरीकार व विचारवंत प्रकांडपंडित, श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1884 रोजी छत्तीसगडमधील रायपूर येथे झाला. अमरावती येथे शालेय शिक्षण. पुढे विल्सन महाविद्यालयात मुंबईला शिक्षणासाठी गेले तथापि पदवी न घेताच अमेरिकेस गेले आणि कॉर्नेल विद्यापीठातून 1911 साली पीएच.डी. पदवी मिळवली. भारतात परतल्यावर ते कलकत्ता विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
वर्ष 1920 मध्ये त्यांचा विवाह इंडिथ व्हिक्टोरिया कोहन या जर्मन ज्यू तरुणीशी पुण्यात झाला. विवाहानंतर त्यांचे नाव शीलवती ठेवण्यात आले. त्यांना या विवाहामुळे पुणेकरांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यांच्या पत्नीने त्यांना ज्ञानकोशाच्या कामासाठी बहुमूल्य मदत केली होती. इंग्रजी व जर्मन भाषेतील भारताबद्दल माहिती असलेल्या ग्रंथांचे भाषांतर त्यांनी करून दिले होते. त्यांना भारतीय संस्कृतीचा अभिमान होता. अपत्य होत नव्हते म्हणून त्यांनी दोन मुले दत्तक घेतली.
द हिस्टरी ऑफ कास्ट इन इंडिया- प्रथम खंड, हा पीएच. डी. साठी लिहिलेला ग्रंथ पाश्चात्त्य विद्वानांत गाजला. त्यात मनुस्मृतीचा काल निश्चित करून मनुस्मृतिकालीन समाजस्थितीचे विशेषतः जातिसंस्थेचे स्वरूप विस्ताराने मांडले आहे. दळणवळणाची साधने वाढल्यामुळे जगातील विविध समाज यापुढे परस्परसदृश होत जातील आणि जग एक होईल असा त्यांचा आशावाद होता. पावित्र्याच्या चुकीच्या कल्पनांमुळे उच्चनीचभाव निर्माण झाला. बालविवाहांमुळे आईबापांच्या मतांवर अवलंबून राहणारी लग्ने जातीबाहेर होणे अशक्य होऊन जातिसंस्था दृढ झाली. केतकरांनीच “एन्सायक्लोपीडिया’ या इंग्लिश शब्दासाठी “ज्ञानकोश’ असा मराठी प्रतिशब्द दिला.
महाराष्ट्रीय ज्ञानकोश हे केतकरांचे खरे कार्य. त्यांनी ज्ञानकोश 23 विभागांमध्ये निर्माण केला. पहिल्या 1 ते 5 प्रस्तावना खंडांत इतिहास व सांस्कृतिक माहिती वाचकांसाठी विषयवारीने मांडली आहे. ज्ञानकोशाच्या विभाग 6 ते 21 मध्ये महाराष्ट्राचा सर्वांगीण विषय लक्षात घेऊन संकलित केला आहे. विभाग 22 मध्ये ज्ञानकोशातील विषयांची सूची असून, विभाग 23 मध्ये हिंदुस्थानाविषयी हरतऱ्हेची माहिती दिली आहे.
त्यामध्ये पहिल्या भागातच भारतातील व भारताबाहेरील हिंदू समाजाची तत्कालीन स्थिती मांडली आहे. दुसऱ्या भागामध्ये वेदविद्या व युद्धपूर्व जग हा विषय आहे तर तिसऱ्या विभागात आधुनिक वैदिक संशोधन दिले आहे. प्रस्तावना खंडांतील चौथा व पाचवा हे विभागात म्हणजे बुद्धत्तोतर जग व विज्ञानेतिहास एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत दिला आहे. केतकर ज्ञानकोशाचे जसे संपादक तसेच व्यवस्थापकही होते. वर्ष 1931च्या हैद्राबाद येथील साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ह्या सेवाभावी संस्थेने त्यांचा ज्ञानकोश संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे. केतकरांचा 10 एप्रिल, 1937 रोजी मृत्यू झाला.