ग्रामीण भागात महिलांच्या डोक्यावर सरपनाचे ओझे कायम ः मध्यम, सर्वसामान्यांना गॅस दरवाढीचे चटके
भवानीनगर -केंद्र आणि राज्य सरकारने ग्रामीण भागामध्ये गोरगरीब महिलांसाठी घरगुती गॅस सेवा उपलब्ध करून दिली. परंतु गरिबांना घरगुती गॅस पैशाविना घेता येत नसल्याने अजूनही ग्रामीण भागामध्ये गोरगरीब महिलांच्या डोक्यावरील सरपनाचे (जळाऊ लाकडाचे) ओझे कमी झालेले दिसत नाही.
अजूनही राज्यातील काही भागांमध्ये महिला चूल पेटवण्यासाठी डोक्यावर सरपनाची (लाकडाची) ओझी वाहतच आहेत. त्यामुळे आधी हाताला चटके तवा मिळे खायाला भाकर अशी अवस्था ग्रामीण भागातील महिलांची झाली आहे. ही परिस्थिती अजूनही ग्रामीण भागात सर्रास पहावयास मिळत आहे. राज्य प्रगतिपथावर आहे हे जरी वारंवार बोलले जात असले तरीही अजूनही राज्यातील मोठ्या प्रमाणात जनता गोरगरीब देखील आहे.
अजूनही काही ग्रामीण भागांमध्ये मोलमजुरी करून जीवण जगणाऱ्या महिला रोज कामावरून येताना शेतामधून लाकडे गोळा करून डोक्यावर आपल्या घरी आणत आहेत. भारत देश हा प्रगतीच्या मार्गावर आहे हे बोलले जात आहे. केंद्र सरकारने गोरगरीब महिलांना ही अगदी छपरा मध्येही महिलांना घरगुती गॅस मिळावा ही योजना अमलात आणली. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये घरगुती गॅसचे दर पाहता गोरगरीब महिलांना घरगुती गॅस घेणेही परवडत नाही. दररोज मोलमजुरी करणाऱ्या महिला कामावरून सुटल्यानंतर त्या ठिकाणी जे काही वाळलेले लाकूड मिळेल ते एकत्र गोळा करून आपल्या डोक्यावर घेऊन या महिला रोज घरी आणत असतात.
अजूनही राज्यामध्ये गरीबी असल्याचे हे चित्र अनेक भागांमध्ये समोर येत आहे. प्रगती झाली, तंत्रज्ञान आले, शिक्षणाच्या सोयी झाल्या, मोठे कारखाने उभा राहिले, तरीही ही ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावरील ओझे मात्र अद्यापही कमी झालेले नाही. राज्यात कितीतरी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गोरगरीब महिला खूप कष्ट करीत असतात. त्यांना प्रपंच चालवण्यासाठी मोलमजुरी करण्याची गरज असते. अजूनही केंद्र आणी राज्य सरकारने गरिबांसाठी या गरीब महिलांसाठी घरगुती गॅसचे दर कमी केले तरच या गरीब महिलांच्या डोक्यावरील सरपणाची (लाकडाची) ओझे कमी होणार आहे.