पुणे विद्यापीठाचे कर्मचारी परस्पर जात असल्याचे उजेडात
कामकाजास फटका : मूळ कामावर परतण्यास ठेंगा
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचारी निवडणूक नसली, तरी परस्पर निवडणुकीच्या कामाला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. निवडणुकीवेळी त्या कामास प्राधान्य द्यावे लागते. ही वस्तुस्थिती असली, तरी निवडणूक झाल्यानंतरही मूळ पदावर रूजू होणे आवश्यक आहे. तसे होताना दिसत नाही. त्याचा फटका विद्यापीठाच्या कामकाजास बसत असल्याचे दिसून आहे.
परस्पर निवडणुकीच्या कामास जात असलेले किती कर्मचारी आहेत, त्याची माहिती विद्यापीठाकडे नाही. त्या पार्श्वभूमीवर अशा कर्मचाऱ्यांना लेखी स्वरूपात कामकाजाची माहिती सादर करण्याचे आदेश विद्यापीठ प्रशासनने दिले आहेत. त्यामुळे असे कर्मचारी अडचणीत येणार असल्याची चिन्हे आहेत.
लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद यासह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामात सरकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग असतो. ऐन निवडणुकीच्या काळात बहुतांश कर्मचारी याच कासाठी नियुक्त केले जातात. मात्र, निवडणूक संपल्यानतंर हे कर्मचारी, अधिकारी पुन्हा आपल्या मूळ कामावर परत येतात. अनेक कर्मचाऱ्यांना सकाळच्या वेळी मुख्य जबाबदारी सांभाळायची आणि दुपारनंतर निवडणुकीच्या कामासाठी पाठवले जाते. त्यामुळे प्रशासकीय कामे खोळंबून राहात नाहीत.
पण, विद्यापीठातील कर्मचारीही निवडणुकीचे काम संपल्यानंतर पुन्हा मुख्य कामावर येणे अपेक्षित आहे. पण सध्या अनेक कर्मचारी विद्यापीठातील कामकाजाकडे टाळाटाळ करत आहेत. अनेक कर्मचारी परस्पर संबंधित निवडणूक अधिकाऱ्याकडून निवडणुकीच्या कामाचे पत्र घेऊन तिकडेच जात आहेत. यामुळे विद्यापीठातील नेमके किती कर्मचारी या कामासाठी गेले आहेत याची माहिती उपलब्ध नाही. तरीही ही संख्या 50 ते 60 असण्याची शक्यता वर्तावली जात आहे. यापुढे विद्यीपाठातील कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे परस्पर निवडणुकीच्या कामाला जाता येणार नाही. त्यासाठी विद्यापीठ प्रशासनाची परवानगी घ्यावी लागेल. या नियमाचा भंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने परिपत्रकाद्वारे दिला आहे.
विद्यापीठाचे कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी जात असतील, तर त्याची रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यांना परस्पर जाता येणार नाही. कर्मचारी कामावर नसल्याने त्याचा परिणाम विद्यापीठाच्या कामावर होत आहे. त्यामुळे जे कर्मचारी निवडणुकीच्या अर्धवेळ किंवा पूर्णवेळ कामासाठी जात असतील तर त्यांनी त्यांची माहिती सादर करावी लागेल.
– डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ