राजेगाव परिसरात शेतकरी चिंतेत
राजेगाव (वार्ताहर) – दौंड तालुक्याच्या पूर्व भागात सध्या ढगाळ वातावरण असल्याने कांदा पिकावर मावा, बुरशी आदी रोगांचा प्रादूर्भाव वाढल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. हाताशी आलेले पीक कसेबसे वाचवण्यासाठी विविध प्रकारच्या महागड्या औषधांची फवारणी कांद्यावर करण्यात येत असून, शेतकऱ्यांना मात्र नाहक आर्थिक भुर्दंड सहन करवा लागत आहे.
शेतकऱ्यांनी या वर्षी महाग बियाणे, रोपे विकत घेऊन कांदा पिकाची लागवड केली आहे; पण निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या मागचे संकट पाठ सोडायला तयार नाही. सध्याच्या ढगाळ हवामानामुळे कांदा पीक पिवळे पडत आहेत, कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांचा एकरी 30 ते 35 हजार खर्च झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा पीक वाचवण्यासाठी महागडी औषधे विकत आणून त्याची फवारणी करून पीक वाचवण्याची धडपड सुरू केली आहे. यामुळे औषध विक्रेते जोमात आणि शेतकरी मात्र कोमात, अशी अवस्था निर्माण झाली असून, शेतकऱ्यांच्या खर्चात मोठी वाढ झालेली आहे.
स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथे मागील वर्षी दुष्काळाची परिस्थिती होती; पण यंदा मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, परतीच्या पाऊस अतिवृष्टीच घेऊन आला आणि शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग झला.