Gujarat – आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा सुरू आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमधील भरूच मतदारसंघातून त्यांच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. यामुळे इंडिया आघाडीत फुट पडल्याचे मानले जात आहे.
गुजरातमधील नेत्रंग येथील एका जाहीर सभेला ते संबोधित करत होते. यावेळी त्यांनी गुजरातमधील डेडियापाडा विधानसभा मतदारसंघातील आपचे आमदार चैत्रा वसावा भरूचमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. चैत्रा वसावा हा सध्या वनविभागाशी संबंधित एका गुन्ह्यात तुरुंगात आहे. यावेळी केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
केजरीवाल म्हणाले, आदिवासी समाजाचे नेते चैत्रा वसावा यांना भाजपने अटक केली आहे. ते आमच्या धाकट्या भावासारखा आहे. पण सर्वात दुःखाची बाब म्हणजे त्यांच्या पत्नीलाही अटक करण्यात आली.
ही संपूर्ण आदिवासी समाजाचा अवमान करणारी बाब आहे. हा वसावांचा लढा नसून तुमचा आहे, तुमच्या सन्मानाचा लढा आहे. आज आपण गप्प बसलो तर भाजपवाल्यांचे मनोबल उंचावेल, असा हल्लाबोल त्यांनी केला.
दरम्यान, याआधी जेडीयूनेही अरुणाचल प्रदेशमधूनही आपला एक उमेदवार जाहीर केला होता. यानंतर आता आप पक्षानेही चर्चेपूर्वीच उमेदवाराची घोषणा केल्यामुळे इंडिया आघाडीतील घटक पक्षातील एकजुटीबाबत शंका उपस्थित केली जात आहे.