मुकुंद फडके
विद्यमान भारतीय क्रिकेट संघाचा अविभाज्य घटक असलेला क्रिकेटपटू विराट कोहली आज आपली 100 वी कसोटी खेळत आहे. गेल्या दोन वर्षांचा त्याचा फॉर्म बघता या शंभराव्या कसोटीमध्ये शतक झळकावून तो पुन्हा एकदा दिमाखात फॉर्ममध्ये परत येईल अशी त्याच्या कोट्यवधी चाहत्यांना निश्चितच अपेक्षा असणार आहे.
क्रिकेटसारख्या वेळखाऊ, दमखाऊ आणि मानसिक व शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणाऱ्या खेळात शंभर कसोटी सामने खेळणे हा निश्चितच महत्त्वाचा माइलस्टोन मानला जातो. क्रिकेटच्या 144 वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत फक्त 70 खेळाडूंना 100 कसोटींचा टप्पा गाठता आला आहे. तर भारताच्या आतापर्यंतच्या इतिहासात फक्त 13 खेळाडूंना 100 पेक्षा जास्त कसोटी खेळता आलेल्या आहेत. भारताचा लिटील मास्टर सचिन तेंडुलकर हा 200 कसोटी खेळणारा एकमेव क्रिकेटपटू आहे. भारतीय क्रिकेटला महान फलंदाजांची परंपरा लाभली असल्याने याच परंपरेचा पाईक असलेला विराट कोहली आज श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरताना आपली 100वी कसोटी खेळणार आहे.
सर्व प्रकारच्या कर्णधार पदाच्या दडपणापासून मुक्त असलेला विराट या शंभराव्या कसोटीमध्ये शतक झळकवून पुन्हा एकदा फॉर्ममध्ये दिमाखात दाखल होईल, अशी आशा त्याच्या असंख्य चाहत्यांना निश्चितच असणार आहे. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये विराटच्या बॅटमधून धावा जरी निघत असल्या तरी त्याच्या नावावर शतक जमा झाले नसल्याने त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ केला असे म्हणता येत नाही. म्हणूनच या ऐतिहासिक कसोटीत शतक करून विराटने पुन्हा एकदा आपण खरोखरच “विराट’ आहे हे सिद्ध करण्याची संधी त्याला आली आहे. तसे पाहता महान फलंदाज म्हणून ज्यांची गणना केली जाते ते सुनील गावस्कर असोत किंवा सचिन तेंडुलकर असोत यांनाही आपल्या शंभराव्या टेस्टमध्ये शतक झळकवता आले नव्हते. शंभर कसोटी खेळणाऱ्या इतर खेळाडूंच्या यादीवर नजर टाकली तर काही महान खेळाडूंनी मात्र हा पराक्रम करून दाखवला आहे.
पाकिस्तानचे इंजमाम उल-हक किंवा त्यापूर्वी जावेद मियॉंदाद किंवा इंग्लंडचा सध्याचा विद्यमान कर्णधार जो रूट, ऑस्ट्रेलियाचा आक्रमक कर्णधार रिकी पॉंटिंग किंवा साउथ आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथ असेल या सर्वांनी आपल्या शंभराव्या कसोटीत शतक झळकावून आपल्या लौकिकाला साजेशी खेळी केली होती. जो रूटने तर आपल्या शंभराव्या कसोटीत द्विशतक झळकावून मोठा विक्रम केला होता, तर रिकी पॉंटिंगने आपल्या शंभराव्या कसोटीमध्ये कसोटीच्या दोन्ही डावांत शतक झळकावून एका आगळ्या विक्रमाची नोंद केली होती. कारकिर्दीत पाहिल्या आणि शंभराव्या कसोटीमध्ये शतक झळकावण्याचा विक्रम पाकिस्तानच्या जावेद मियॉंदाद आणि वेस्ट इंडिजच्या गार्डन ग्रीनिज यांच्या नावावर नोंदला गेला आहे. या विक्रम वीरांच्या यादीत बसण्याची संधी विराट कोहलीला मिळाली आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे सध्या विराटचे सर्व प्रकारचा क्रिकेटमधील स्थान घसरले आहे. ते सुधारण्याच्या दृष्टिकोनातून त्याला या शंभराव्या कसोटीमध्ये चांगली खेळी करणे महत्त्वाचे आहे. सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून 70 शतके झळकवणारा विराट सचिन तेंडुलकरच्या खालोखाल भारतातील एकमेव क्रिकेटपटू आहे. आणखी एक शतक झळकवून तो रिकी पॉंटिंगच्या 71 शतकांशी बरोबरी करू शकतो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 43 आणि कसोटी क्रिकेटमध्ये 27 शतके विराटच्या नावावर आहेत. श्रीलंका विरुद्ध होणाऱ्या सामन्यात त्याने शानदार शतक झळकावले तर त्याच्या नावावर हा आणखी एक विक्रम जमा होऊ शकतो.
आणखी एक सकारात्मक बाब म्हणजे श्रीलंकेविरुद्ध नेहमीच विराटची बॅट आक्रमकपणे तळपली आहे आणि अनेक मोठ्या खेळी केल्या आहेत. त्यामुळे नशिबानेसुद्धा विराटला एक चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. विराटला प्रोत्साहन देण्यासाठी प्रेक्षकही उपस्थित राहणार आहेत आणि गेले काही दिवस विराटच्या शंभराव्या कसोटीची सर्वांनाच उत्सुकता असल्याने समाज माध्यमावर विराटला शुभेच्छा दिल्या जात आहेत. सर्वच बाजूंनी शंभराव्या कसोटीमध्ये शतक झळकावण्याची एक चांगली संधी आणि वातावरण निर्मिती विराटसाठी तयार झाली आहे आणि त्याचा लाभ त्याने घेणे महत्त्वाचे आहे.
गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांच्या सारख्या महान फलंदाजाना जे जमले नाही ते काम जगातल्या काही देशातल्या दुसऱ्या फळीतील फलंदाजांनी करून दाखवले आहे. क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजीचा नेहमीच वरचष्मा राहिला आहे; पण शंभराव्या कसोटीत शतक करणारा कसोटीपटू मात्र अजून भारताच्या विक्रमाच्या पुस्तकात नोंदवला गेला नाही. हा विक्रम करण्याची संधी विराट कोहलीला मिळाली आहे. आपल्या पूर्वीच्या फॉर्ममध्ये पुन्हा परत येण्यासाठी विराट कोहलीला एका मोठ्या खेळीची गरज आहे हे त्यालाही माहीत आहे. गेल्या काही महिन्यांत त्याच्याकडून छोट्या छोट्या खेळी चांगल्या झाल्या आहेत. काही अर्धशतके तर निश्चितच झळकावली आहेत; पण शतक केल्यानंतर जो आत्मविश्वास येतो तो विराटला सध्याच्या कारकिर्दीच्या वळणावर गरजेचा आहे.
जर शंभराव्या कसोटीमध्येच त्याने हा पराक्रम केला तर त्याच्या बॅटमधून आणखीन काही वर्षे धावांचा पाऊस निघण्याची शक्यता अधिकच वाढू शकते. जगातील नऊच खेळाडूंना आतापर्यंत हा पराक्रम करता आला असला तरी या यादीत 10 वा खेळाडू बनण्याचा मान विराट निश्चितच मिळवू शकतो. भारतासाठी हा मान मिळवणारा पहिला खेळाडू बनण्याचा विक्रम तो नोंदवू शकतो. साहजिकच आजपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये विराटच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडेल आणि त्याच्या नावावर शतक नोंदले जाईल अशी इच्छा त्याच्या चाहत्यांच्या मनात आहे.