पाकला काश्मिरींच्या नावाने दिशाभूल करता येणार नाही
नवी दिल्ली, दि. 3 – काश्मीरच्या जनतेच्या नावाने पाक सरकारने जागतिक लोकमताची दिशाभूल करू नये, असा इशारा पंतप्रधान इंदिरा गांधींनी आज पाक सरकारला दिला आहे. जम्मू व काश्मीरच्या जनतेने भुट्टोंच्या हरताळाच्या आदेशास पूर्णपणे “हरताळ फासला’ आणि अशा तऱ्हेने काश्मिरी जनतेने पाकला त्याच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करण्याविरुद्ध चांगलाच ठोसा लगावला आहे.
भारताने काश्मीर “गिळंकृत’ केले
– चीनची जहरी टीका
टोकियो – काश्मीर करार म्हणजे भारतात काश्मीरचे सामीलीकरणच होय, असे चीनचे म्हणणे आहे. चीनकडून पाकच्या भूमिकेला पाठिंबा देण्यात आला आहे. भारताने काश्मीर गिळंकृत केले असल्याची टीका चीनने केली.
ना. चव्हाण व नाईक “परस्पर प्रशंसंति’
मुंबई – मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी असे जाहीर केले की, मी माझ्या मंत्रिमंडळात एकोपा कसा नांदेल इकडे लक्ष पुरवीन व या एकोप्याचे रूपांतर प्रेमात व्हावे यासाठी प्रयत्न करीन. मंत्रिमंडळात एकोपा ठेवणे ही परंपरा मोरारजी देसाईंपासून चालत आली आहे. चव्हाण पुढे म्हणाले, माजी मुख्यमंत्री नाईक यांनी राज्यात सत्तासंक्रमण ज्या पद्धतीने घडवून आणले त्यामुळे नाईकांचे नाव लोकशाहीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदले जाईल. त्यानंतर नाईकांनी चव्हाणांना संपूर्ण पाठिंबा देण्याचे जाहीर केले.
शस्त्रपुरवठ्यामुळे अशांतताच होईल
नवी दिल्ली – भारतीय उपखंडात होणाऱ्या शस्त्रपुरवठ्यामुळे अशांतताच निर्माण होईल, या भारताच्या मताशी युगोस्लाव्हिया पूर्णपणे सहमत आहे.