- अमित डोंगरे
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत यंदा भारतीय खेळाडूंनी स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च कामगिरी करताना सात पदकांची कमाई केली. 23 जुलैपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत आधी ब्रॉंझ मग रजतपदकांची कमाई खेळाडू करत होते; पण सुवर्णयश काही मिळत नव्हते.
त्यातच अनेक मानांकित खेळाडूंना सातत्याने अपयश येत होते व भारतासाठी ही स्पर्धा अत्यंत निरस होत चालली होती. अचानक चमत्कार घडावा असे काहीतरी घडले व भालाफेकपटू नीरज चोप्राने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. याच निरस ते नीरज या वाटचालीवर प्रकाश टाकण्याचा हा लेखप्रयत्न…
भारताचे शंभरपेक्षा जास्त खेळाडूंचे पथक टोकियोला रवाना झाले तेव्हा नीरज चोप्रा नावाचा कोणी भालाफेकपटू आहे हे सांगावे लागत होते. सगळा प्रकाशझोत नेमबाज, तिरंदाज, कुस्तीपटू, बॅडमिंटन व हॉकी संघ यांच्यावरच होता. पण एखाद्या अनभिज्ञ कालाकाराचा जंजिर नावाचा चित्रपट प्रदर्शित व्हावा व एका रात्रीत अमिताभसारखा सुपरस्टार जन्माला यावा तसे काहीतरी घडले व संपूर्ण देशाला नीरज चोप्रा हे नाव माहिती झाले.
भारताचा आघाडीचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने देशासाठी सुवर्णपदक पटकावताना इतिहासही रचला. थोडे गतकाळात जाऊन डोकावू. नीरज हा लहानपणी शरीराने स्थूल होता. त्याला त्याच्या गावात मोटा सरपंच असे म्हणून चिडवायचे. त्यावेळी हा जाडजूड मुलगा खेळाडू होईल असे सांगूनही कोणी त्यावर विश्वास ठेवला नसता. अखेर गावातील मंडळींच्या डिवचण्याला कंटाळून नीरज पानिपत येथील शिवाजी स्टेडियमवर तंदुरुस्त होण्यासाठी जाऊ लागला.
त्यावेळी त्याने तिथे काही खेळाडूंना भालाफेक करताना पाहिले व त्यालाही या खेळात रुची वाटू लागली. त्यानंतर नीरज रोज न चुकता स्टेडियमवर जाऊ लागला व भालाफेकीचे धडे गिरवायला सुरुवात केली. हाच मोटा सरपंच आपल्यापेक्षा जास्त लांब भाला फेकू शकतो हे त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या खेळाडूंच्या लक्षात येऊ लागले व तेदेखील त्याला जास्त प्रोत्साहन देऊ लागले. त्याचवेळी त्याचे वडील सतीशकुमार यांनाही ही गोष्ट समजली व त्यांनीही आपल्या मुलाने याच खेळात कारकीर्द करावी यासाठी त्याला पाठिंबाही देत होते. त्यानंतर मात्र नीरजचा आळशीपणा दूर झाला व एका राष्ट्रीय खेळाडूचा खऱ्याअर्थाने जन्म झाला.
अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण व खेळाची सांगड घालत नीरज मोठा झाला. नीरजचा जन्म 27 डिसेंबर 1997 साली हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील खांद्रा गावात एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. नीरजने आपले शिक्षण चंडीगढमधून पूर्ण केले. भालाफेक या खेळाची कोणतीही पार्श्वभूमी त्याच्या कुटुंबातच काय गावातही नव्हती. तरीही मागे न हटता त्याने शिक्षणाबरोबरच खेळातही सातत्य राखले व पहिल्यांदा जिल्हा, राष्ट्रीय व ज्युनिअर स्तरांवर कामगिरी सिद्ध करत त्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही गुणवत्ता सिद्ध केली.
त्याच्या याच कामगिरीच्या जोरावर त्याच्याकडे ऑलिम्पिक मटेरियल म्हणून पाहिले जाऊ लागले. टोकियोत झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत नीरजने देशाला एक तपापेक्षाही जास्त काळानंतर सुवर्णपदक मिळवून दिले. यापूर्वी 2012 सालच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताचा अव्वल नेमबाज अभिनव बिंद्राने भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले होते. नीरज यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला तेव्हाच त्याच्याकडून सुवर्णयशाची अपेक्षा केली जाऊ लागली.
त्यातही नीरजने निराश केले नाही. पहिल्याच फेरीत 87.03 मीटर अंतरावर भाला फेकला व स्पर्धेतील सर्वोत्तम अंतराची नोंद केली. मात्र, ही पात्रता फेरी होती व खरे आव्हान पुढेच होते. दुसऱ्या फेरीत तर नीरजने 87.58 मीटर भाला फेकला आणि पदकही जवळपास निश्चित केले. तिसऱ्या फेरीत नीरजने 76.79 मीटर भाला फेकला होता, पण दुसऱ्या फेरीतील त्याची कामगिरी सर्वोत्तम होती. इथेच त्याने सुवर्णक्षणांचा इतिहासही लिहिला.
ऑलिम्पिकला सुरुवात होण्यापूर्वी आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळवत नीरज परतला, तेव्हाच त्याच्याकडे संभाव्य ऑलिम्पिकपदक विजेता म्हणून पाहिले जाऊ लागले. नीरजने कोट्यवधी देशवासीयांचे स्वप्न पूर्ण करत टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऍथलेटिक्समधील देशाचे पहिले सुवर्णपदक पटकावत नवा अध्याय रचला. या अंतिम फेरीत दुसऱ्या प्रयत्नात 87.58 मीटर अंतराची नोंद केली. हे अंतर
स्पर्धेतील कोणत्याही भालाफेकपटूला मागे टाकता आले नाही. हे ऑलिम्पिक ऍथलेटिक्समधील 100 वर्षांतील भारताचे पहिलेच पदक ठरले आहे. तसेच यंदाच्या ऑलिम्पिकमधील हे भारताचे एकूण सातवे पदक ठरले. भारताने 2012 सालच्या लंडन ऑलिम्पिकमधील 6 पदकांच्या सर्वोत्तम कामगिरीला मागे टाकले. नीरजच्या रूपाने भारताचे हे ऑलिम्पिक स्पर्धांतील केवळ दुसरेच वैयक्तिक सुवर्णपदक ठरले आहे. याआधी बिंद्राने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले होते.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने सर्वाधिक 7 पदकांची कमाई केली. त्यात नीरजने सुवर्ण, वेटलिफ्टर मीराबाई चानू व कुस्तीपटू रवीकुमार दहिया यांनी रजतपदक मिळवले. कुस्तीपटू बजरंग पुनिया, बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, महिला मुष्टियोद्धा लोवलीना बोरगोहेन व भारताच्या पुरुष हॉकी संघाने ब्रॉंझपदकाची कमाई केली. ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकीत भारताला नीरजच्या रूपाने मिळालेले हे पहिलेच सुवर्णपदक ठरले आहे.
नीरजच्या आजवरच्या कारकिर्दीकडे पाहिले तर त्याच्यातील अव्वल खेळाडू लगेचच लक्षात येतो. 2016 साली भारतात झालेल्या दक्षिण आशियाई खेळांमध्ये नीरजने सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर 2016 सालीच नीरजने पोलंडमध्ये झालेल्या 20 वर्षांखालील स्पर्धेतही सुवर्णयश मिळवले होते. लांब उडीतील अव्वल खेळाडू अंजू बॉबी जॉर्जनंतर जागतिक स्तरावरच्या ऍथलेटिक स्पर्धेत पदक पटकवणारा नीरज केवळ दुसराच भारतीय ठरला होता. या कामगिरीनंतर नीरजची भारतीय सेनेत ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
2018 साली इंडोनेशियाच्या जकार्तात झालेल्या आशियाई स्पर्धेतही त्याने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. या स्पर्धेत सुवर्णयश मिळवणारा नीरज पहिलाच भारतीय खेळाडू ठरला होता. त्यानंतर राष्ट्रकुल स्पर्धेतही त्याने आपली गुणवत्ता सिद्ध करताना पदकांची रास ओतली. 2018 साली नीरजच्या खांद्याला दुखापत झाली होती. यामुळे तो बराच काळ खेळापासून लांब होता. 2019 साली तर त्यापेक्षाही मोठा धक्का बसला. त्याला करोनाची बाधा झाली व त्याला ऑलिम्पिक खेळता येईल का यापेक्षाही जास्त त्याला त्या स्पर्धेत पात्र तरी होता येईल का अशी परिस्थिती निर्माण झाली.
मात्र, वेळेवर घेतलेले उपचार व विलगीकरणात राहिल्यावर त्याने सरावासाठी दिमाखात पाऊल ठेवले. गेल्या मार्च महिन्यात थाटात पुनरागमन करताना नीरजने इंडियन ग्रॅंड प्रिक्स स्पर्धेत 88.07 मीटर भाला फेकत स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मागे टाकला व नवी कामगिरी नोंदवली. गेल्यावर्षी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टोकियो ऑलिम्पिकच्या पात्रता व निवड चाचणीत नीरजने 88.06 मीटर भाला फेकला व पात्रता मिळवली.
नीरजच्या यशाने संपूर्ण देश ऑलिम्पिकमय झाला यातच त्याचे यश समावलेले आहे. आता अन्य खेळांना मिळू लागलेली लोकप्रियता कमी होऊ नये यासाठी देशातील क्रिकेट वगळता सर्व क्रीडा संघटनांनी राज्य तसेच केंद्र सरकारच्या मदतीने आपल्या क्षमता असलेल्या खेळाडूंना जास्तीत जास्त स्पर्धा खेळायला दिल्या पाहिजेत. तसेच 2024 साली होत असलेल्या पॅरिस ऑलिम्पिकच्या दृष्टीने आतापासूनच तयारी सुरू केली पाहिजे. ज्यांच्याकडे क्षमता व गुणवत्ता आहे त्या खेळाडूंना तसेच नवोदितांनाही सातत्याने सुविधा पुरवत परदेशातही सराव व स्पर्धा खेळण्याची संधी दिली गेली पाहिजे, तरच पॅरिसमध्ये पदकांची संख्या तर वाढेलच पण पदकाचा रंगदेखील सोनेरी दिसेल.
धोनीचा आदर्श केशरचनेत ठेवला
नीरजची ओळख भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याची कॉपी असा केला जात होता. याला कारण होते ती त्याची पदार्पणातील धोनीसारखी केशरचना. त्याचे लांब केस हीच त्याची ओळख बनली होती. मात्र, त्याने चक्क याच लांब केसांचा त्याग केला व नव्या रूपातील देखणा नीरज टोकियोत दाखल झाला. सुवर्णपदक पटकावल्यानंतर तर धोनीने नीरजला खास शुभेच्छा देताना त्याच्या केशरचनेची आठवणही करून दिली होती. मात्र, तेव्हा नीरजने धोनीला धन्यवाद देतानाच भविष्यात पुन्हा एकदा तशीच केशरचना करणार असल्याचे सांगितले.