पुणे – वानवडी येथील दिव्यांग कल्याणकारी संस्थेमध्ये 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पडला. ‘माझी माती माझा देश’ या उपक्रमांतर्गत देशासाठी बलिदान देणाऱ्या शहिदांच्या कुटुंबीयांचा व पोलीस दलामध्ये राष्ट्रपती पदक मिळालेल्यांचा यावेळी सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिगेडियर दिनेश खत्री व कर्नल रामचंद्रन म्हणून उपस्थित होते.
ब्रिगेडियर खत्री व कर्नल रामचंद्र यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर राष्ट्रगीत झाले. कार्यक्रमाला संस्थेतील विद्यार्थी व निमंत्रित असे मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे कार्याध्यक्ष एडवोकेट मुरलीधर कचरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉक्टर जैन यांनी करून दिला.
याप्रसंगी ब्रिगेडियर दिनेश खत्री व कर्नल रामचंद्रन यांनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले. पुरस्कारार्थींच्या वतीने 1962चे युद्धात शहीद झालेले त्यांची कन्या आशा पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शहीद जवान माधवराव जगताप व 1971 च्या युद्धातील शहीद जवान हुतात्मा दत्तू शिवले यांचे सुपुत्र काळुराम शिवले याप्रसंगी उपस्थित होते.
एडवोकेट कचरे यांनी यावेळी आपल्या मनोगतात स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विशद केले व स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कित्येक क्रांतिकारकांनी आपले जीवन राष्ट्रासाठी अर्पण केले या सर्वांची आज आपण आठवण ठेवली पाहिजे, असे नमूद केले. प्रमुख पाहुणे ब्रिगेडियर दिनेश खत्री यांनी 1962 व 1971 च्या युद्धात आपले प्राण अर्पण केले त्या सर्वांची आठवण केली व श्रद्धांजली वाहिली. कर्नल रामचंद्र , राष्ट्रपती पदक विजेते पोलीस शिपाई विजय भोंग यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. सचिव अविनाश नाईक यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. सूत्रसंचालन मुख्याध्यापिका शिवानी सुतार यांनी केले.